रायपूर: छत्तीसगढमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ती घटना दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलात घडली. लचू मांडवी आणि पोडिया अशी ठार झालेल्या नक्षलींची नावे आहेत.
खतरनाक नक्षलवादी असलेल्या त्या दोघांसाठी याआधीच प्रत्येकी 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा खात्मा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडील पिस्तूल आणि रायफल ताब्यात घेण्यात आली. दरम्यान, दंतेवाडा जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलींनी ते कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्ती खबऱ्या असल्याचा आरोप करणारे नक्षलींचे पत्रक मृतदेहाच्या बाजूला आढळले.