अतिपावसामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती, शेतकरी अडचणीत
सातारा – सध्या शेतकरी चारी बाजूंनी अडचणीत आला आहे. परतीच्या पावसाने बारा हजार हेक्टरवरील पिकांना फटका दिला असून पाटण तालुक्यातील सर्वाधिक 216 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 1311 गावे बाधित झाल्याची माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.
खरिपाच्या सुरुवातील पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम लांबला. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी धाडस करत खरिपातील पेरण्या केल्या. जिल्ह्यात 90 टक्क्यांवर पेरणीची कामे झाली होती. दुष्काळी तालुक्यात अतिटंचाई, गावात पेरण्या न झाल्यामुळे दहा टक्के क्षेत्र नापेर राहिले होते. पावसाच्या आगमनाने पिकांच्या वाढी चांगल्या असतानाच पश्चिम भागात अतिपाऊस झाल्याने धरणे भरली.
नदीच्या पाणी पात्रात पाण्याची झालेली वाढ व धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा, कोयना या प्रमुख नद्यांना महापूर आल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली गेले. तसेच मोठ्या प्रमाणात पिकांत पाणी साचले. यामुळे पिके कुजून कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला.
प्रशासन व नेत्यांकडून यांची पाहणी करून भरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी पिचला गेला आहे. यातून बाहेर पडत असतानाच पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टी, महापुरातून वाचलेली पिके परतीचा आणि त्यानंतर वादळी पावसाने झोडपून काढल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील काढणीला आलेली पिके बाधित झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या सरल्या अपेक्षाही जवळपास संपत आल्या आहेत.
प्रमुख पिके गेली
जिल्ह्यात मागील दहा वर्षांपासून खरिपात सोयाबीन प्रमुख पीक झाले आहे. दसरा, दिवाळीच्या तोंडावरा पैसे उपलब्ध करून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात असल्याने या पिकाच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी वाढ झाली आहे. याही हंगामात 60 हजार हेक्टवर सोयाबीनची पेरणी झाली. पिके गेल्या तीन आठवड्यापासून काढणीला आली होती. मात्र या काळात परतीचा आणि वादळी पाऊस सुरू राहिल्याने सोयाबीन झडले आहे.
काही ठिकाणी उगवले, काळे पडले आहे. काढणी झालेल्या पिकांवर डाग पडल्याने हमीभावापेक्षा एक हजार ते 1200 रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. नाडलेल्या शेतकऱ्यांची गरज ओळखून सर्रास ठिकाणी व्यापाऱ्यांकडून लुटीचे प्रकार सुरू असतानाही जिल्ह्यात अजूनही हमीभाव केंद्रे सुरू झालेली नाहीत. भात पीक वाऱ्यामुळे पडले असल्याने कुजले आहे. खरीप ज्वारी काळी पडली आहे.
द्राक्ष बागांचे कोट्यवधीचे नुकसान
फलटण तालुक्यातील खडकी, हिंगणगाव, निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी आदी गावांत एक दिवसात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे या तालुक्यातील 200 हेक्टरपेक्षा द्राक्ष पिकांवर डाग पडले आहेत तसेच घड फुटले आहेत.
यामुळे द्राक्षाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार दीपक चव्हाण यांनी पाहणी केली आहे. हा अपवाद वगळता परतीच्या व वादळी पावसाने झालेल्या नुकसानीकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. या तालुक्यातील कांदा, डाळिंब यांचेही मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षासाठी एकरी भांडवली खर्च व अपेक्षित उत्पादन बघता एकरी दहा लाखांवर नुकसान झाले आहे.
दिवाळी शेतातच
सर्वात उत्साह आणि आनंदाचा दिवाळीसारखा प्रमुख सण हा बहुतांशी शेतकऱ्यांचा शेतात गेला आहे. हात लागतील ती पिके काढणे, किंवा वाया गेली पिके शेतातून काढून रब्बी हंगामात उत्पादन मिळेल, यासाठी शेते तयार करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. पिकांचे पैसे न झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी निरुत्साहात गेली आहे.