मुंबई – शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सत्तास्थापनेसाठी संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सामनातील रोखठोक या सदरातून, “राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपाने एकदा करून पाहावीच”, अस म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला ईडी, पोलीस,पैसा यांचा धाक दाखवून आणि इतर पक्षातील आमदार फोडून भाजपला सरकार बनवावे लागेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य केल होत. याशिवाय, “रथाचे चाक अडकले आहे आणि भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत?” असा सवालही राऊत यांनी केला आहे. तर, “श्री. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते आणि मुंडे मुख्यमंत्री झालेच असते तरी युतीतील आजची कटुता दिसली नसती”, अशी खंत देखील राऊत यांनी ‘अहंकाराच्या चिखलात रथचक्र! एक सरकार बनेल काय?’ या लेखातून व्यक्त केली आहे.
काय म्हटलय लेखात ?
‘रेकॉर्ड’वर पलटी
महाराष्ट्राचे निकाल स्पष्ट आहेत. भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. शिवसेना सोबत नसती तर हा आकडा 75 च्या वर गेला नसता. ‘युती’ होती म्हणून गती मिळाली. ‘युती’ होते तेव्हा कुणाच्या किती जागा आल्या यापेक्षा ‘युती’ करताना निवडणुकीआधी काय करार झाले होते ते महत्त्वाचे असते. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या, पण श्री. फडणवीस हे आधी ठरल्याप्रमाणे शिवसेनेस अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाहीत. पदांचे समान वाटप असे ‘रेकॉर्ड’वर बोलल्याचे पुरावे असताना भाजपचे देवेंद्र पलटी मारतात व पोलीस, सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या मदतीने सत्तास्थापनेसाठी हालचाली करतात.
हा लोकशाहीचा कोणता प्रकार? इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो दिवस काळा दिवस म्हणून पाळणाऱ्यांकडून हे असे घडावे याचे आश्चर्य वाटते. 24 तारखेस निकाल लागले त्या दिवशी संध्याकाळीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठय़ा मनाने ‘मातोश्री’वर जाऊन पहिली चर्चा सुरू करायला हवी होती. वातावरण तापलेच नसते, पण 105 कमळांचा हार म्हणजे अमरपट्टा. तो कोण हिरावून घेणार? 2014प्रमाणे शिवसेना सर्व गोष्टी मान्य करील या भ्रमात सगळे राहिले. तो भ्रम उद्धव ठाकरे यांनी पहिल्या आठ तासांत दूर केला. 2014 साली शिवसेना सत्तेत गेली. आता ती घाई शिवसेना करणार नाही व फरफटत जाणार नाही हे धोरण त्यांनी ठेवले व वायफळ चर्चेचे दरवाजेच बंद केले.
‘शिवसेनेशिवाय बहुमत असेल तर सरकार बनवा, मुख्यमंत्री व्हा!’ हा सरळ संदेश श्री. उद्धव ठाकरे यांनी दिला. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पक्षात आज कोणीही विरोधक आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार उरलेला नाही. हा एक विचित्र योगायोग आहे. श्री. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते व मुंडे मुख्यमंत्री झालेच असते तरी युतीतील आजची कटुता दिसली नसती. श्री. मुंडे यांचे निधन झाले. एकनाथ खडसे यांना आधी डावलले व संपवले. त्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयोजन केले.
आता ‘मुक्ताईनगर’ मतदारसंघातून खडसे यांच्या मुलीलाही पराभूत केले. पंकजा मुंडे पराभूत झाल्या. विनोद तावडे यांना घरी बसवले व चंद्रकांत पाटील यांची कोंडी केली. तरीही देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापन करू शकले नाहीत व एक-एक अपक्ष गोळा करीत आहेत, पण या गोळाबेरजेतून 145 जमतील काय?