Vanchit-Congress | Prakash Ambedkar | Lok Sabha Election 2024 – महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. विरोधी बाकावर असलेल्या मविआने आपले बळ वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.
दरम्यान, आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, त्यासाठी तयारी करायला हवी, असा प्रस्ताव आम्ही दिला आहे, असे सांगितले.
त्यांच्या या विधानामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत नवं राजकीय समीकरण निर्माण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल तसेच लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर भूमिका मांडली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात. आतापासूनच आपण तशी तयारी करायला हवी असा प्रस्ताव मी काँग्रेससमोर ठेवला आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. लोकसभेसाठी आम्ही मुंबईतही उमेदवार देणार आहोत.
काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना त्यांचा विधानसभा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिली आहे. त्यांना बळीची बकरी करण्यात आले आहे. भाई जगताप त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांना डावलून बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. काँग्रेसचा या खेळीचा आम्हाला फायदा होणार आहे, असे आंबेडकरांनी सांगितले.