तुळजापूर – आई तुळजाभवानी मंदिराचा (Tuljabhavani Temple) तब्बल 12 वर्ष बंद असलेला टोळ भैरवनाथ दरवाजा (Tol Bhairavnath Darwaza)उघडण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या संदर्भातील मागणी आता पूर्ण झाली आहे. या निर्णयामुळे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
रविवारपासून सुरु होत असलेल्या नवरात्रोत्सावाच्या निमित्ताने येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची अपेक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. तुळजापूर देवी मंदिराचे विश्वस्त राणा जगजितसिंह पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, “सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अनेक वर्षांपासून असलेली लोकांची मागणी पूर्ण करण्यात यश आले. यामुळे भाविकांची अधिक सुविधा होणार आहे. काळानुरूप काही निर्णय घेण्यात येत असतात. पण कलोचीत आणि परिस्थितीनुरूप असे निर्णय बदलले तर त्याचा लाभ होत असतो.’
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील टोळ भैरव दरवाजा मागील 12 वर्षांपासून बंद होता. या संदर्भात अनेकदा दरवाजा उघडण्याची मागणी करण्यात आली होती. वास्तविक पुजारी आणि नागरिकांनी अनेक वेळा हा दरवाजा उघडण्याची मागणी केली होती.
मात्र, प्रत्येक वेळी दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान गेल्या वर्षी देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी मंदिर संस्थानाकडे दरवाजा बंद करण्यासंदर्भातील आदेशच नसल्याचे समोर आले होते. तुळजापूर पोलिसांनी सुद्धा दरवाजा बंद करण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचा आरोप करण्यात आला होता.