हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बर्धमान येथे 13 जानेवारी 1926 रोजी झाला (निधन 9 एप्रिल 2009). त्यांचे वडील अभियंता होते.
शक्ती दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे शिक्षणाकरिता ते त्यांच्या नातेवाईकांकडे डेहराडून येथे आले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण डेहराडून येथेच झाले. वर्ष 1944 मध्ये त्यांनी कोलकाता विद्यापीठातून पदवी घेतली. तेथे त्यांनी हिंदी व उर्दू भाषेचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांना नंतर हिंदी चित्रपटांचे संवाद व गीते परिणामकारक करण्यासाठी फायदा झाला. हिंदी चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी व अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथील विद्यालयात त्यांनी काही काळ उर्दू शिक्षकाची नोकरीही केली.
ते मुंबई येथील बॉम्बे टॉकीजमध्ये अशोककुमार यांना भेटले. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी वर्ष 1948 मध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली व चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीस फणी मजुमदार, ज्ञान मुखर्जी, सतीश निगम यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वर्ष 1949 मध्येे राज कपूर यांच्या ‘सुनहरे दिन’ या चित्रपटाचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते. त्याबरोबर त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या.त्यामध्ये फणी मजुमदार दिग्दर्शित ‘बादबान’ आणि ‘धोबी डॉक्टर’ यांचा समवेश आहे.
वर्ष 1954 मधे त्यांनी ‘बहू’ हा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला कथात्मक चित्रपट आहे. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले इन्स्पेक्टर, शेरू, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वत:ची चित्रपटनिर्मिती संस्था 1957 मध्ये स्थापन केली. वर्ष 1958 मधे ‘शक्ती फिल्म्स’ मार्फत त्यांनी ‘हावडा ब्रिज’ या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. अशोककुमार आणि मधुबाला यांचा अभिनय असलेल्या या चित्रपटाने लोकप्रियतेचा विक्रम केला. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला वळण मिळाले. त्यांनी एकूण 43 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातील 37 हिंदी व 6 बंगाली चित्रपट होते.
वर्ष 1964 मध्ये त्यांनी ‘कश्मीर की कली’ या चित्रपटापासून रंगीत चित्रपट निर्मिती सुरू केली. त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये इव्हिनिंग इन पॅरिस, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम असे चित्रपट उल्लेखनीय आहेत. 1950 ते 1975 या दरम्यान त्यांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्नाला नायक म्हणून घेतले. त्यावेळी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच लोकप्रिय झाले.
या दरम्यानच राजेश खन्ना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. ‘आराधना’ या चित्रपटाने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. यामध्ये राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांचा सुरेख अभिनय व सचिन देव बर्मन यांचे सुमधुर संगीत, यामुळे हा चित्रपट यशस्वी झाला. त्यांना 4 चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष तसेच केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.