कन्यादान ही हिंदू विवाह सोहळ्यातील एक चांगली परंपरा अथवा विधी आहे. तथापि, त्याचे प्रत्येक जण आपापल्या परीने अर्थ काढत असल्यामुळे किंवा त्यावर आपली भूमिका मांडत असल्यामुळे हा विषय चर्चेचा आणि काहीसा अंतर्मुख करणाराही आहे.
तुम्ही एखादी वस्तू अथवा संपत्ती कोणाला स्वेच्छेने देणे म्हणजे दान मानले जाते. मात्र, कन्यादानाच्या बाबतीत हा अर्थ लागू होऊ शकत नाही. कारण, त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची मुलगी कोणाला तरी संपत्ती अथवा वस्तू म्हणून उपयोग करण्यासाठी देत आहात. यावरून बर्याच चर्चा सध्या सुरू आहे. हिंदूधर्मात विवाहसोहळा हा वर्षानुवर्षे चालत आलेल्या विधींनुसार संपन्न होत असतो. यातील काही विधी पितृसत्ताक परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे असल्याचे काही जणांचे आक्षेप आहेत. कन्यादान हा विधीही त्यातलाच एक प्रकार. वास्तविक हिंदू विवाहात कन्यादानाला विशेष महत्त्व आहे. मात्र तसे करणे आवश्यक आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेत न्यायालयाने विवाह विधीपूर्वक संपन्न झाला असे मानण्यासाठी कन्यादान आवश्यक नसल्याचे मत व्यक्त केले.
हिंदू विवाह कायद्यानुसार सप्तपदी हा विवाह सोहळ्यातील आवश्यक विधी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. विवाहसोहळ्यात वधू आणि वर पवित्र अग्नीभोवती सात फेरे घेतात त्याला सप्तपदी म्हणतात. यातील प्रत्येक फेर्याला अर्थ असतो आणि तो घेताना हे जोडपे शपथ घेत असते अथवा परस्परांना वचन देत असते. आरोग्य, सौख्य, परस्परांची काळजी घेणे आणि परस्परांचा आदर करणे अशा प्रकारची शपथ आणि वचन फेरे घेताना दिले जाते. सुख-दु:खात काळजी घेणे, कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहण्याची आणि आयुष्यातील चढ-उतारात एकमेकांना साथ देण्याची हमी दिली जाते. मैत्री व विश्वासाचे एक नवे नाते तेथे निर्माण होत असते. त्याला ज्येष्ठ आणि आप्तांच्या उपस्थितीत मान्यता दिली जाते.
कन्यादानाची प्रथा वैदिक काळापासून सुरू असल्याचे मानले जाते. या शब्दाचे भाषांतर केले तर कन्या म्हणजे मुलगी आणि दान म्हणजे ती दुसर्याला देणे असे होते. या सोहळ्यात वधूचे पालक पवित्र अग्नीसमोर आपली मुलगी वराच्या हातात सोपवतात. वधूचा पिता वधूचा उजवा हात वराच्या हातात देतो आणि आपल्या मुलीला समानतेची वागणूक देण्याची त्याला विनंती करतो. मुलीच्या पालकांचे अर्थात माता-पित्यांचे पाप क्षालनाचा हा प्रकार असल्याचेही म्हटले जाते. मुलीची आई वधू-वराच्या हातावर पाणी सोडते व त्यावर फळे- फुले आणि अन्य सामग्री ठेवते असा हा विधी असतो. हा विधी होईपर्यंत वधूची आई काही खात-पीत नाही म्हणजे तिचा उपवास असतो.
कन्यादानाच्या संकल्पनेमागे असा तर्क आहे की महिलेला पुरुष पालकाची अर्थात गार्डीयनची गरज असते. मुलीचा विवाह होईपर्यंत तिचे पिता तिचे पालक किंवा रक्षक असतात. विवाहाच्या वेळी ही जबाबदारी वराकडे अर्थात तिच्या पतीकडे सोपवली जाते. आशुतोष यादव नावाच्या व्यक्तीने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपल्या विवाह सोहळ्यात कन्यादानाचा विधी झाला नसल्यामुळे विवाह संपन्न झाला नसल्याचा दावा त्याने केला होता. त्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कन्यादान आवश्यक नसल्याचा निर्वाळा दिला.
काय आहे तर्क?
पूर्वी मुलींचे विवाह अगदी लहान वयात केले जायचे. ती पित्याकडे असायची तोपर्यंत तिच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती व नंतर पतीकडे हस्तांतरित केली जायची. आताच्या काळात ही संकल्पना कालबाह्य झाली असल्याचे म्हणण्यामागे एक कारण आहे. अभ्यासकांनी आणि अनेक स्त्रीवाद्यांनी अलीकडच्या काळात त्याला विरोध केला आहे. काही चित्रपट तारकांनी रिअल लाइफमध्येही हा विधी टाळला आहे व त्यावर आपले भाष्यही केले आहे. तर अलीकडच्या काळात एक नायिका तिच्या रियल लाइफमधील विवाह सोहळ्यात स्वत:शीच संवाद साधताना या प्रथेचा मनातल्या मनात विरोध करतानाही दाखवण्यात आली आहे. आपले कुटुंब आपल्याला परक्याचे धन असल्यासारखे का ट्रीट करते, आपण तात्पुरते त्यांच्या कुटुंबातील घटक असल्याचे का मानतात. आपल्यावर एवढे प्रेम करूनही दुसर्याला दान करण्यासाठी आपण एक वस्तू आहोत का? कन्यादानच का असा नायिकेच्या मनात सुरू असलेला संवादही एका जाहिरातीत दाखवण्यात आला आहे.
अगदी अलीकडेच 2019 मध्ये एका बंगाली पित्याने आपल्या मुलीचे कन्यादान करण्यास नकार दिल्यामुळे त्याचीही बरीच चर्चा झाली होती. मुंबईत आयटी क्षेत्रातील एका तज्ज्ञ महिलेच्या म्हणण्यानुसार, आजच्या काळात खरे तर या विधीला काही अर्थ नसतो. मात्र, तरीही तो करावाच लागतो असे सांगताना संबंधित महिलेने स्वत:चेच उदाहरण दिले. ती गुजराथी कुटुंबातील तर तिचा होणारा पती पंजाबी होता तरीही आम्हाला हा विधी करावाच लागला, असे ती म्हणाली. त्यातून काही नुकसान झाले नाही आणि एक मान्यता असलेला विधी केला तर त्यात बिघडले कुठे, असाही तर्क आहे. तथापि, हल्ली प्रत्येक विषयावर व्यक्त होण्याची संधी आणि व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे वैचारिक देवाणघेवाण सुलभ झाली असून त्यातून होणार्या घुसळणीत काही चांगली वेगळी बाजू समोर आली तर ती स्वीकारायला हरकत नाही अथवा कोणत्याही बाबीचा विचारच न करता अव्हेरण्याचेही काही कारण नाही.
सबुरीचा सल्लाही काही जणांकडून दिला जातो हे चांगले लक्षण. त्यांच्या मते एक वस्तू किंवा मालमत्ता दान केली जाते आहे एवढ्या संकुचितपणे याकडे बघायला नको. सप्तपदी घेतल्यानंतर आणि परस्परांचा आदर, सन्मान करण्याची, समानतेची वागणूक देण्याची शपथ घेतल्यानंतर आणि विवाहाच्या पवित्र बंधनात अडकल्यानंतर वधूच्या पित्याकडून दिला जाणारा तो आशीर्वाद असतो व त्या दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. त्याचा काळाशी आणि पितृसत्ताक वगैरे व्यवस्थेशी काही संबंध नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मुळात व्यक्त होणे आणि चांगल्याचा स्वीकार करणे हेच प्रगतीशील समाजाचे लक्षण असते. त्या अनुषंगाने विचार करता जुन्याकडे नकारात्मक पाहण्याऐवजी त्यामागच्या भावना अथवा हेतू समजण्याचा प्रयत्न झाला तर त्यात नुकसान नाही आणि नवा विचार जर कोणी मांडत असेल तर त्याला प्रतिगामी म्हणून हुसकावण्याचा प्रकार होऊ नये याचीही दक्षता घेतली जाणे तितकेच महत्त्वाचे.