– हिमांशू
चूक आणि गुन्हा यात ङ्गरक आहे. चुकून होते ती चूक असते; पण ती जाणूनबुजून केली तर तो गुन्हा होतो. चुकीवर ‘सॉरी’ची मात्रा चालते; पण गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. अर्थात ड्रायव्हर, डॉक्टर आदींना चुकूनसुद्धा चूक करण्याची संधी नसते. तिथे चूकही गुन्ह्याइतकीच गंभीर ठरते. पण एखाद्यानं गुन्हा करताना चूक केली, तर काय होतं? त्या चुकीचा ङ्गायदा पोलिसांना मिळतो आणि गुन्हेगार जाळ्यात अडकतो. विनोदी चित्रपटांमध्ये आपल्याला असे विनोदी गुन्हेगार दिसतात.
पण गुन्हा करताना झालेली चूक काही वेळा इतकी गंभीर असते, की ती एकाच वेळी अनेकांसाठी शोकांतिका ठरते. कर्नाटकातला एक ताजा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. गदग शहरात चार जणांची नुकतीच हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. या घटनेचा तपशील भल्याभल्यांना चक्रावून टाकणारा आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, ज्या चार जणांची हत्या होणार होती, ते सहीसलामत आहेत आणि ज्यांचा काडीचा संबंध नाही अशा चौघांनी प्राण गमावलेत.
प्रकरण गुंतागुंतीचं असलं तरी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हा गुन्हा ‘सुपारी देऊन’ घडवून आणलेला आहे. वाद होता मालमत्तेचा. दोन सावत्र भावांमधली ही भांडणं. विनायक बकाले हे या घटनेतल्या मास्टरमाइंडचं नाव. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून त्याला त्याचा सावत्रभाऊ कार्तिक याचा काटा काढायचा होता. विनायकचे वडील प्रकाश यांच्या दुसर्या पत्नीचं नाव सुनंदा. तिचा मुलगा कार्तिक. प्रकाश, सुनंदा आणि कार्तिक म्हणजे वडील, सावत्र आई आणि सावत्र भाऊ अशा तिघांना संपवण्याचा डाव विनायकने रचला. त्यासाठी त्याने महाराष्ट्रातल्या एका टोळीला सुपारी दिली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा सौदा 65 लाखांचा होता आणि त्यातले दोन लाख विनायकने टोळीला आगाऊ दिले होते. सुपारी घेणार्या टोळीने ठरल्या दिवशी या कुटुंबावर हल्ला केला. पण त्यावेळी कार्तिक वगळता इतर दोघे घरात नव्हते. परंतु कार्तिकच्या लग्नासाठी आलेले काही पाहुणे घरात होते आणि टोळीतल्या लोकांना तेच प्रकाश आणि सुनंदा आहेत, असं वाटलं.
‘काँट्रॅक्ट किलर्स’ना कार्तिक सापडला; पण त्याच्याबरोबर पाहुण्यांपैकी 55 वर्षांचा एक गृहस्थ, त्याची 45 वर्षांची बायको आणि 16 वर्षांची मुलगी या तिघांना जीव गमवावा लागला. म्हणजे गुन्हाही घडला आणि त्यात चूकही घडली. पण परिणाम किती गंभीर! लग्नघरात पाहुणे म्हणून जाणंही जिवावर यावं, अशी ही घटना. शिवाय, यात आणखी एक अँगल आहे. तो म्हणजे, सुपारी देणं ही गोष्टकिती कॅज्युअल झालीये!
असुरक्षिततेची भावना समाजात पसरते ती अनिश्चिततेच्या माध्यमातून. हमखास सुरक्षित अशी ठिकाणंच कमी होऊ लागली आणि प्रत्येक ठिकाणी धोकाच दिसू लागला, तर जावं कुठे? गुन्हेगारी विश्वात शब्दाला महत्त्व असतं आणि दिलेला शब्द पाळला जातो, वगैरे आपल्या कानावर नेहमी येत असतं. या पार्श्वभूमीवर ‘सुपारी देणं-घेणं’ इतकं निष्काळजीपणे होत असेल आणि आपण ज्याला मारतोय त्याची ओळख पटवण्याचीही गरज संबंधितांना वाटत नसेल तर मामला गंभीर आहे. अनिश्चिततेबाबत आपण आणखी एक पायरी खाली उतरलो आहोत.