– माधव विद्वांस
कृषी क्षेत्रात शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्रयोग परिवार’ नावाची संस्था उभी करणारे प्रा. श्रीपाद अच्युत दाभोलकर यांचा आज स्मृतिदिन (निधन 30 एप्रिल, 2001). त्यांचा जन्म कोल्हापूर येथे 11 ऑगस्ट 1924 रोजी झाला.
दाभोलकर या घराण्यातील दाभोळकर आडनावाची सारी माणसं नामांकित होती. प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोलकर (व्यासंगी समाजशील विधिज्ञ), अरुण दाभोलकर (प्रसिद्ध चित्रकार, जलतरंगातील गणपतीचे शेकडो मनोवेधक नमुने यांचेच), भरत दाभोलकर (प्रख्यात जाहिरातज्ज्ञ).
या घरातील कुलगुरू देवदत्त दाभोलकर, दत्त प्रसाद दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आपापल्या क्षेत्रात दिग्गज होते. प्रा. श्रीपाद दाभोलकर हे गणिती म्हणून प्रसिद्ध होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात विज्ञान व गणिताचे प्राध्यापक होते. गारगोटी विद्यापीठात व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला होता.
त्यावेळी महात्मा गांधींच्या कार्यपद्धतीने कर्मचारीवर्गाच्या बाजूने त्यांनी तीन वर्षे प्रखर लढा दिला. त्यांनी शेती, विज्ञान, गणित, लोकशाहीकरण, आहार, आरोग्य, गर्भातील मुलाची वाढ, बालसंगोपन, निकोप यौवन, सुखी पालकत्व असे अनेक विषय हाताळले. अध्यापन करीत असताना त्यांच्या घराच्या परसात त्यांचे शेतीवरील प्रयोग सुरू होते.
अनिश्चित पाऊस बळीराजाचे आर्थिक गणित अवघड करीत होता. कमी वेळ, कमी पाणी आणि कमी जागा या तीन गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन केले. त्यांचे प्रयोग छोट्या गोष्टीतून मोठ्या लक्ष्याकडे नेणारे होते. एका चौरस मीटर जागेवर येणार्या सूर्यप्रकाशामधील एक ते दीड टक्के सूर्यप्रकाशच आजची वनस्पती उचलते हे विज्ञानान सांगते.
पण तरीही एकदशांश चौरस मीटर जागेत कलिंगडाचा वेल शंभर दिवसांत तीन किलो कलिंगडे देतो. तसेच तेवढ्याच वेळात द्राक्षाचा वेल 400 ते 600 ग्रॅम वजनाचा घड देऊ शकतो, तर केळी तेवढ्याच जागेत वर्षभरात पाऊण ते एक किलो केळी देते हे पण त्यांनी सिद्ध केले.
याबरोबर ऊस, भुईमूग, भात किंवा ज्वारीचेही गणित त्यांनी मांडले होते. घराच्या परसात त्यांनी सेंद्रिय व जैविक खतांचाही अभ्यास करून त्यांनी जैविक कचरा वापरून टोमॅटोच्या एका रोपापासून 6 किलो उत्पादन होऊ शकते हे सिद्ध केले.
घराच्या परसात त्यांनी सर्व प्रकारचा जैविक कचरा वापरून टोमॅटोच्या एका रोपापासून 6 किलो उत्पादन घेऊन दाखविले. त्याच धर्तीवर आंब्याच्या झाडाला दर 100 पानांमागे एक फळ मिळालेच पाहिजे,
तसेच ज्वारीचा अभ्यास करून एका ताटाला 100 दाणे तर एका हेक्टरामागे 100 क्विंटल असे गणित, हे त्यांनी प्रयोगाने सिद्ध केले. ग्रामीण आणि शहरी भागातील कचर्याचे उपयुक्त खतात रूपांतर करणारे गांडूळ खत प्रकल्पाची मध्य प्रदेश राज्यात सर्वप्रथम सुरुवात आणि प्रसार केला.
त्यांनी शिबिरे घेऊन हजारो शेतकर्यांना प्रशिक्षण दिले. शेतीसाठी उपयोगी पडणारे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध केले. कृषिविषयक साहित्यामध्ये आधुनिक द्राक्ष लागवड, आपला हात जगन्नाथ, केल्याने होत आहे रे, प्लेन्टी फॉर ऑल (इंग्रजी), विपुलाच सृष्टी, सर्जन-विसर्जन-सर्जन यांचा समावेश आहे.