पंतप्रधान मोदी यांची काल पुण्यात सभा झाली. पुण्यात सभा म्हटल्यावर शरद पवारांवर टीका करणे हे ओघाने आलेच. त्यानुसार त्यांनी पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर यथेच्छ टीका केली. यावेळी त्यांनी पवारांना उद्देशून ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. गेल्या 45 वर्षांपासून एक नेता महाराष्ट्र सातत्याने अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, आपल्याला यश मिळाले नाही की दुसर्याचा विनाश करायचा अशी त्यांची प्रवृत्ती असते, असे काहीसे ते बोलले आहेत. निवडणुकांचे भाषण म्हटले की विरोधकांवर टीकाटिप्पणी करणे अप्रासंगिक नसते. पण एखाद्या ज्येष्ठ नेत्याचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा करणे हे मात्र चांगलेच खटकणारे ठरले आहे.
दिवंगत नेत्याच्या अनुषंगाने असा उल्लेख एकवेळ लोकांनी आक्षेपार्ह ठरवलाही नसता; पण जिवंत असलेल्या नेत्याविषयी असा उल्लेख करणे हे मात्र शोभनीय नव्हते. शरद पवार आणि मोदी यांच्यातील व्यक्तिगत मैत्रीसंबंध सर्वांनाच ठाऊक आहेत. मागे एकदा महाराष्ट्रातल्याच एका जाहीर कार्यक्रमात मोदींनी पवारांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना ‘पवारांचे बोट धरूनच आपण राजकारण शिकलो त्यामुळे ते आपले राजकीय गुरू आहेत’, असेही म्हटल्याचे सर्वांच्याच स्मरणात आहे. एवढेच नव्हे तर पवारांच्या कर्तृत्वाचा त्यांना ‘पद्मविभूषण’ हा भारतरत्नच्या खालोखाल महत्त्वाचा पुरस्कार देऊन मोदी सरकारनेच गौरव केला आहे, हेही सर्वांच्या ध्यानात आहे.
पण मोदी हे असे नेते आहेत की निवडणुकीच्या व्यासपीठावर गेले की त्यांना कसलेच धरबंद राहात नाहीत. ज्यांना आपण आपले राजकीय गुरू मानले त्यांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करणे लोकांना आवडेल की नाही याचाही विचार त्यांनी केलेला दिसला नाही. सन 2014 च्या निवडणुकीत बारामतीत घेतलेल्या सभेत त्यांनी ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी’चा उल्लेख ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असाही केला होता. सन 2014 चा तो काळ असा होता की केंद्रात यूपीए सरकार सत्तेवर होते व शरद पवार कृषिमंत्री होते. पवारांच्या मंत्रिपदाच्या काळात पवारांनी पक्षीय मतभेद मागे टाकून गुजरातमधल्या मोदी सरकारला मदत केली होती.
ही त्यावेळची ताजी पार्श्वभूमी एका क्षणात पडद्याआड करून त्यावेळी मोदींनी पवारांवर चौफेर टीका केली होती. ती बाबही एकवेळ गौण मानता येईल; पण काल त्यांनी पवारांचा असा केलेला उल्लेख मात्र पवार समर्थकांना डिवचणारा ठरणार आहे, त्यांच्यात मोदी व भाजपविषयी त्वेषाची भावना निर्माण करणारा ठरणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आहेत, पवारांचा जवळपास 80 टक्के पक्ष अजित पवारांनी आपल्या बरोबर नेला आहे. अशाही अवस्थेत पवार एकाकी लढा देताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते, कार्यकर्ते गेले त्यांनाही मोदींची टीका कितपत मानवली असेल या विषयी शंका आहे. अजित पवारांकडे गेलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना मोदींनी ‘भटकती आत्मा’ असे संबोधणे त्यांच्यात क्लेष निर्माण करणारे ठरू शकते.
कारण, अजित पवारांकडे गेलेले लोकही शरद पवारांविषयी कमालीची आत्मियता बाळगून आहेत, हे विसरता येणार नाही. त्यामुळे अर्थातच त्याचा फटका भाजप-अजित पवार युतीला बसू शकतो. काहीही झाले तरी पवारांविषयी महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आदराचीच भावना आहे. त्यांच्या विषयी मतभेद कितीही असले तरी त्यांनी राज्याचे अनेक अर्थाने भले करण्याचाच सातत्याने प्रयत्न केला आहे, ही बाब कोणीही सहजी नजरेआड करू शकत नाही. राज्याचे कृषी क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो अगदी क्रीडा क्षेत्र असो शरद पवारांनी तेथे भरीव कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा येथे उमटवला आहे.
त्यांच्या उंचीचा नेता आज महाराष्ट्रात नाही हे खुद्द मोदीही जाणून आहेत. म्हणूनच त्यांना डॅमेज केल्याशिवाय आपल्याकडे मते वळणार नाहीत असा हिशेब करून मोदींनी पवारांवर हा तोफखाना चालवला असावा, पण मोदींचा हा हिशेब जरा चुकलाच आहे. मोदींनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या या दिग्गज नेत्यावर केलेली टीका महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेलाच आव्हान देणारी ठरणार आहे हे भान मोदींनी ठेवणे अपेक्षित होते. हीच कॅसेट मोदी यांनी माळशीरस आणि अन्य ठिकाणच्या सभेत वाजवली आहे. येथे पवारांची एकतर्फी बाजू घेण्याचा प्रश्न नाही, पण पवारांनी महाराष्ट्रात 45 वर्षे काहीच केले नाही ही मोदींची टीका फाजील स्वरूपाची व अवास्तव आहे म्हणूनच मोदींचे गणित येथे फसणार आहे. या टीकेला स्वतः शरद पवारांनी आज त्यांच्या नेहमीच्या संयमित स्वरूपात उत्तर दिले आहे.
पवारांनी म्हटले आहे की, ‘मोदी म्हणतात ते अगदी खरे आहे, आपला आत्मा खरंच तळमळतो आहे; पण तो हालअपेष्टा सहन करणार्या शेतकर्यांसाठी तळमळतो आहे. स्वार्थासाठी माझा आत्मा तळमळत नाही, सध्या संपूर्ण देशातील लोक त्रस्त आहेत, त्यांना प्रपंच चालवणे अवघड बनले आहे. प्रचंड महागाईने लोक होरपळत आहेत, त्यांच्यासाठी मी शंभर वेळा तळमळेल.’ लोकशाहीत कोणालाही टीका करण्याचा अधिकार असतो असे नमूद करीत पवारांनी शालीनता दाखवली आहे. मोदींच्या सध्याच्या निवडणूक भाषणांची गाडी अनेक ठिकाणी घसरताना दिसते आहे. त्यांनी या आधी मासे खाणार्या एका नेत्यावर टीका केली होती,
त्यानंतर काँग्रेसची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर असल्याचा भीषण दावा त्यांनी केला होता. काँग्रेस आता देशात वारसा कर लागू करून तुमची संपत्ती हडप करणार असून ती अल्पसंख्याकांना वाटणार आहे असाही आरोप त्यांनी केला होता. पण हे आरोप अंगलट आल्याने आणि त्याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्याने मोदींनी आपल्या भाषणांचा ट्रॅक थोडा बदलला आहे. मछली, मंगळसूत्र आणि मुसलमान अशा भलत्याच मुद्द्यांवरचा त्यांचा रोख आता समोरच्या नेत्याला डॅमेज करण्याच्या दिशेने वळला आहे. त्याची पहिली गाज काल पुण्यात पवारांवर पडली. त्यावर आता महाराष्ट्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्याचा मोदी व भाजपवरच बुमरँग होण्याचा धोका अधिक दिसतो आहे.