– शर्मिला जगताप
गणपत पाटील यांचा आज स्मृतिदिन. तमाशाप्रधान चित्रपटांत नाच्याची भूमिका त्यांनी अजरामर केली. त्यांची भूमिका एवढी जिवंत होती की लोक त्यांना “नाच्या’ म्हणूनच ओळखू लागले. खरेतर त्यांच्या कार्याचा यथायोग्य सन्मान केला गेला पाहिजे. नव्या पिढीला नाच्या आणि गणपत पाटील ही दोन व्यक्तिमत्त्व समजायला हवी. कारण त्या काळात नाच्याचे जीवन म्हणजे भयंकर यातनाचे. कारण केवळ नाच्याची भूमिका करत असल्यामुळे या यातनांचे चटके गणपतरावांनी आयुष्यभर सोसले.
त्यांच्या जन्माची निश्चित तारीख उपलब्ध नाही. कोल्हापुरात गरीब कुटुंबात जन्म. घरची हलाखीची परिस्थिती. ते लहान असतानाच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच त्यांना मोलमजुरी करावी लागली. मोलमजुरी करतानाही त्या काळी कोल्हापुरात चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका साकारली.
गणपतरावांची राजा गोसावी यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतूनच त्यांना मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मात्र, मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापूरला परत आले.
गणपतरावांना राजा परांजपे यांच्या “बलिदान’ व राम गबाळे यांच्या “वंदे मातरम्’ या चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. भालजी पेंढारकरांच्या “मीठभाकर’ (1949) चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. चित्रपटांबरोबरीनेच गणपतराव नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या “ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची म्हणजेच “नाच्या’ची भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. “जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. त्यांची नाच्याची भूमिका विशेष गाजल्यामुळे त्यांना पुढे हीच भूमिका मिळत गेली.
कृष्णा पाटलांनी “वाघ्या मुरळी’ (1964) चित्रपटात त्यांना नाच्याचीच भूमिका दिली. वाघ्या मुरळी या चित्रपटानंतर त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत रूढ झाले. 23 मार्च 2008 रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.