रायपूर – आक्रमक फलंदाज युसूफ पठाण व सिक्सर किंग युवराज सिंग यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत इंडिया लिजंण्ड्स संघाने श्रीलंका लिजंण्ड्स संघाचा 14 धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे विजेतेपद मिळवले.
युसूफ नाबाद 62 धावा व युवराजच्या 60 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकांत 4 बाद 181 धावा उभारल्या. त्यानंतर श्रीलंका संघाच्या पहिल्या चारही फलंदाजांना युसुफ व इरफान या पठाण बंधूंनी बाद करत त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली.
धडाकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्याने 43 धावांची खेळी केली. त्याला साथ देताना कौशल्य वीररत्नेने 38 व चिंतका जयसिंघेने 40 धावा केल्या मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. त्यांचा डाव 7 बाद 167 धावांवर रोखत इंडिया लिजंण्ड्सने विजेतेपद पटकावले.