करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ वर पोहचली
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात आज (दि.२९) रोजी ३ गावात ३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ झाली असून त्यापैकी ५ जण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग वाढत चालला असून आज पुन्हा वेताळे, वाजवणे, वाशेरे या तीन गावात प्रत्येकी एक करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. तर तालुक्यातील येलवडी येथील एक बाधित सापडला असून त्याची नोंद पिंपरी चिंचवड मध्ये झाली आहे. तालुक्यात करोनाचा मोठा शिरकाव झाला आहे. दरम्यान ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहेत. त्या सर्व मुंबई वरून गावी आलेल्या असल्याचे सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी सांगितले.
आज वाशेरे, वाजवणे आणि वेताळे येथे करोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी या गावांना भेट देऊन पाहणी करून ग्रामस्थांना आवश्यक सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांतअधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या माध्यमातून करोना बाधित गावांना भेटी देऊन खबरदारीची उपाययोजना कार्यान्वित केली जात आहे.
तालुक्यातील तब्बल १२ गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. खेड तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये मुंबई येथून नागरिक आल्याने संसर्गाचा धोका वाढतच चालला आहे. खेड तालुक्यात पाईट, कुरकुंडी, झित्राईमळा(चाकण), कडूस, वडगाव, पापळवाडी. राक्षेवाडी,वडगाव न खेड या गावानंतर आता वाजवणे, वेताळे, वाशेरे येथे करोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुक्याचा पश्चिम भाग हादरला आहे. पश्चिम भागात मोठ्या संख्येने मुंबईकर आल्याने आणि ते काळजी घेत नसल्याने गावागावात करोनाची दहशत पसरली आहे. मुंबई, पुणे वरून येणाऱ्या नागरिकानी काळजी घेत स्वता क्वॉरंटाईन व्हावे.प्रशासनाला माहिती द्यावी गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी जावे असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
खेड तालुक्यात मुंबईवरून आलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेण्यासाठी आलेल्या व्यक्तिंची गावोगावी तपासणी करावी. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावे अशा सूचना प्रशासन देत असले तरी मुंबईवरून आलेले नागरिक काळजी घेत नसल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावाला धोका निर्माण झाला आहे. गावातील मुंबईवरून येण्याचा ओघ सुरूच असल्याने गावातील नागरिक भयभीत होत आहेत. गावातील सरपंच पोलीस पाटील यांनी सतर्क राहून बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींना कोरंटाईन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
याबाबत सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले कि, मुंबई मधून आलेल्या व्यक्ती नियम पाळत नसल्याने करोनाचा फ़ैलाव होत आहे. स्थानिक कमिटी याबाबत निष्काळजी पणा दाखवत असल्याने गावावर करोनाचे संकट ओढवले जात आहे. कमिटीतील सरपंच हा अध्यक्ष असतो तलाठी उपाध्यक्ष व ग्रामसेवक सचिव आहे मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे गावागावात रुग्ण वाढत आहेत. ग्रामपंचायत सतर्कता बाळगत नाही. गावातील नागरिकांनी सतर्क राहून बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीचा अहवाल आरोग्य विभागाकडे द्यावा, गावातील कमिटीला सूचित करावे. नियमांचे पालन करावे बाहेरगावावरून गावी आलेल्या व्यक्तींनी कोरंटाईन होऊन नियम पाळावेत असे आवाहन केले आहे.