- उपमुख्यमंत्री पवार : आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न
पिंपरी – “करोना’चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या “लॉकडाऊन’मुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वच कामकाज ठप्प आहे. नोकऱ्या, व्यवसाय, व्यवहारावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार लवकरच पॅकेज देणार आहे. मंत्रीमंडळात त्याबाबतचा निर्णय घेण्याचे नियोजन आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 29) दिले.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पुण्याहून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात आलेल्या जगताप डेअरी (साई चौक) येथील उड्डाणपुलाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते. उद्घाटन झाल्यानंतर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पवार म्हणाले, केंद्र सरकारने 21 लाख कोटीचे पॅकेज दिले. त्यातून वेगवेगळ्या राज्यातील जनतेच्या हातामध्ये किती पैसा जाणार आहे, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. केवळ मोठ-मोठे आकडे पहायला मिळाले. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते अशा सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी आमच्या परीने आम्ही केंद्राकडे मागणी करत आहोत. वेगवेगळा पत्रव्यवहार केंद्राकडे केला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. त्या प्रसंगी देखील या मागण्या केल्या आहेत.
ते म्हणाले, राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग बाहेर जात आहे. उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, राजस्थान भागात कामगार गेला आहे. त्यांची वाट बघत असताना आपल्या राज्यात जिथे मागासलेला भाग आहे, तिथल्या गरीब वर्गाने काम मिळविण्याचा प्रयत्न करावा. कामगाराला काही कौशल्य द्यायचे असेल तर, राज्य सरकार देईल. परंतु, राज्यातील मजुरांनाच कसे काम मिळेल हे कटाक्षाने पाहिले जाईल.
ग्रामीण भागात देखील वाढताहेत रुग्ण
“करोना’ आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची करोनाबाबतची सद्य:स्थिती आम्ही जाणून घेत असतो. त्यासाठी जादा अधिकारी दिले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात करोनाचे प्रमाण कमी दिसत होते. मात्र, अलिकडच्या काळात शहरातील नागरिक गावांकडे जायला लागल्याचे प्रमाण वाढल्यापासून ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या वाढायला लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरीही पुरेशी काळजी घेतल्यास घाबरण्याचे कारण नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. देशात चौथा लॉकडाउन सध्या सुरू आहे. लॉकडाऊन वाढविण्याबाबत केंद्र सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऐकायला मिळेल. मात्र, लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याबाबतच निर्णय ते राज्य सरकारांवर सोपवतील, अशी शक्यता असल्याची माहिती पवार यांनी दिली.