मुंबई – सचिन वाझे यांना पोलिस सेवेत परत घेण्याचा निर्णय एकट्या परमवीरसिंह यांचाच होता. त्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणताही दबाव आणला नव्हता. परमवीरसिंह आणि वाझे यांच्यात अत्यंत घनिष्ट संबंध आहेत.
वाझे यांना अटक होणार हे लक्षात येताच परमवीरसिंह यांनी वाझे यांच्याशी बंद दाराआड तीन तास चर्चा केली होती अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली. त्यांनी भाजपच्या प्रत्येक दाव्याला मुद्देसूद उत्तर देत त्यांच्या आरोपांमधील हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले की कोणत्याहीं सरकारी अधिकाऱ्यावर आरोप झाले की सुरूवातीला त्याची पाठराखण करणे ही सरकारचीच जबाबदारी असते. पण या प्रकरणातील तथ्य बाहेर आल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी केली जाते असे वक्तव्य त्यांनी वाझे यांच्या संबंधात बोलताना केले. वाझे यांचे खरे स्वरूप चौकशीतून उघड झाल्यानंतर सरकारने त्यांची पाठराखण केलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात फडणवीस यांनी सुरूवातीपासूनच साऱ्या खोट्या बाबी पुढे केल्या आहेत असे ते म्हणाले. टीआरपी घोटाळ्यात परमवीरसिंह हे सुरूवातीला सक्रिय होते पण नंतर त्यांच्यावर कोणाचा दबाव आला हे कळत नाही असे मलिक म्हणाले. 17 तारखेला आपली बदली होणार असे कळताच त्यांनी 16 तारखेला आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याकडून व्हॉट्सऍप संदेश मिळवून खोटा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला.
परमवीरसिंह आणि फडणवीस यांनी या प्रकरणात केवळ खोटी माहिती देऊन सनसनाटी निर्माण केल्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. खासदार डेलकर प्रकरणात त्यांनी केंद्र सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन त्यांची सहानुभुती निर्माण करण्याचा प्रयत्न परमीवरसिंह यांनी केला असे ते म्हणाले.
दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांनीही मुंबई पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसच करणार की दादरा नगर हवेलीचे पोलिस करणार असा सवालही त्यांनी केला.