बाबीर यात्रेमुळे उपलब्ध होणार बाजारपेठ
योगेश कणसे
लोणी देवकर – खास यात्रेतील हक्काची बाजारपेठ असलेल्या ग्रामीण भागातील व्यावसायिकांना यात्रा सुरू झाल्याने दोन वर्षांनंतर हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात घरबसल्या चालणाऱ्या व्यवसायांमध्ये घोंगडी, कोपरी, शेतात दररोजच्या वापरातील हत्यारे, घरगुती लाकडी व दगडी साहित्य बनविणारे कारागिरांसह मिठाई व्यावसायिकांचा समावेश असतो आणि हे व्यवसाय यात्रेतील बाजारपेठेत वर्षभराला पुरेल एवढी कमाई करून देतात.
रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर देवाची यात्रा मोठ्या स्वरूपात भरते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची संख्या विचारात घेता येथील यात्रा बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. यात्रेत मोठ्या संख्येने येणाऱ्या मेंढपाळ वर्गाकडून मागणी होत असलेल्या घोंगडी व कोपरी विक्रीची येथे स्वतंत्र पेठ आहे. या घोंगडी विक्रीत तीन दिवसांत लाखोंची उलाढाल होत होती. सध्या मात्र घोंगडी उत्पादक गारठलेल्या अवस्थेत आहेत.
रुई येथील बाळासाहेब भगत म्हणाले, येथील बाबीर देवाच्या यात्रेबरोबर भादे (लोणंद) व सालप येथील बिरोबा, वीर येथील म्हस्कोबा, धुळदेव, देवदैठण येथील खंडोबा, पंढरपूर, आळंदी येथील यात्रांमध्ये घोंगड्यांना मोठी मागणी असते. सध्या घोंगडी तयार करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. गावात सुमारे 20 कुटुंबातील 50 लोक हातमागावर घोंगडी उत्पादन करण्याचे काम करीत होते. सध्या मोहन भगत यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती हे काम करत आहेत. त्यांनीही आता घोंगडी निर्मितीला बगल देत वुलनपासून शाल विणण्याचे काम सुरू केले आहे.
कोपरी उत्पादक बाळू मारकड म्हणाले, यंदाही यात्रा सुरू झाल्याने कोपरीची मागणी वाढली आहे. गावोगावच्या आठवडे बाजारात कोपरी हातोहात विक्री होत होती. यंदा बाजारही सुरू असल्याने आमचा व्यवसाय अडचणीत मार्ग काढत आहे. गावात दहा कारागिर कोपरी तयार करत होते. मात्र त्यांच्यावर सध्या शेतमजूरी करण्याची वेळ आली आहे.
सध्या होलसेल दुकानदारांकडून कोपरीस मागणी आहे. मात्र करोनापूर्वी असलेली मागणी व सध्याच्या मागणीत खूप तफावत आहे. यात्रा, बाजार सुरू झाल्याने आमच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा कारागीर व्यक्त करीत आहेत.
“देवाच्या यात्रेसाठी आलेले भाविक आवर्जून घोंगडी घेतात. या व्यवसायाला सध्या खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारात कारखान्यात तयार होणारी घोंगडी आली आहे. ही घोंगडी हातमागावर बनविलेल्या घोंगडीच्या तुलनेत स्वस्त आहे. मात्र हातमागावर बनविलेली घोंगडी उबदार व टिकाऊ असूनही ग्राहक पैसे वाचविण्यासाठी स्वस्तातील घोंगडी घेतात. याशिवाय करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा बंद असल्याने हक्काच्या बाजारपेठेला घोंगडी उत्पादकांना मुकावे लागले होते.”
– बाळासाहेब भगत, घोगडी उत्पादक रुई