मराठवाड्यासाठी मोठा दिलासा ः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
धरणात 10 हजार 392 क्युसेकने पाण्याची आवक
छत्रपती संभाजीनगर –राज्यात काही दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. यावर्षी प्रथमच जायकवाडीतील पाणीसाठा 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणात 10 हजार 392 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकसह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळणार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर, वरील याच धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
धरणात सध्या एकूण 1611.208 दलघमी पाणीसाठा असून, यापैकी 873.102 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा समजला जात आहे. सोबतच जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटला आहे.
चार महिन्यांत 18 टीएमसी
मागील तीन वर्षांपासून सतत जायकवाडी धरण 100 टक्के भरत आहे. मात्र, यंदा आधीच मान्सून उशिरा आला, त्यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. त्यामुळे याचे परिणाम जायकवाडीच्या पाणीसाठ्यावर देखील झाले. कारण, यंदा जायकवाडी धरण संपूर्ण पावसाळा संपत आला असतानाही धरणाचा पाणीसाठा 50 टक्क्यांपर्यंत देखील पोहोचू शकला नाही. मात्र, अधूनमधून झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात काही प्रमाणात पावसाची आवक झाली आहे. 1 जून ते आजपर्यंत या धरणात एकूण 512.63 दलघमी म्हणजेच 18.10 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.