काही पक्षांना स्वबळावर सत्तेत येण्याची स्वप्ने
बारामती – राज्यात सुरू असणाऱ्या घडामोडी पाहता काहीही घडू शकते, स्वतःच्या ताकदीवर सरकार आणण्याची स्वप्ने काही पक्षांना पडू लागली आहेत. त्यामुळे अजून बरीच उलथापालथ पाहायला मिळेल. दुसरीकडे काहीही झाले तरी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करूनच विधानसभेच्या निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याचा पुनरुच्चार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा रविवारी (दि. 4) मेळावा पार पडला त्यावेळी पवार बोलत होते. राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, उद्योग व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, सामान्य माणूस हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही, असे असताना सत्ताधाऱ्यांना मात्र विधानसभेच्या निवडणुकी व्यतिरिक्त इतर काहीही सूचत नाही. उजनी धरण 30 टक्क्यांच्या पुढे गेले असते आणि आमचे सरकार असते, तर मी तातडीने कालव्याला पाणी सोडायचे निर्देश दिले असते. उजनी भरून त्याचे पाणी कर्नाटकात निघून जाईल, तेव्हा या सरकारला जाग येईल. इतिहास बघून व थोडे धाडस करून असे निर्णय घ्यावे लागतात.
ग्रामपंचायतींनी निवडणूक आयोगाला ठराव पाठवावेत
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेअर बाजारात जी घसरण झाली. त्यामुळे सामान्यांचे सहा लाख कोटी रुपये बुडाले. दरम्यान, 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत त्यांनी विधानसभेची निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी अशा आशयाचे ठराव करून ते निवडणूक आयोगाला पाठवावेत, असे आवाहनही पवार यांनी केले.
भाजपमधूनही आऊटगोईंग
भाजपच्या डॉ. अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. तर किरण गुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या विकासाची वाटचाल या पुस्तिकेचे प्रकाशनही अजित पवार यांनी केले.
बारामतीतीतून नवीन चेहरा द्यायचा का?
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांचा उल्लेख पुणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री असा गंमतीने करताना त्यांनी मला या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्या, असा आग्रह केला. त्यावेळी नव्या चेहऱ्याची सुरुवात बारामतीपासूनच करायची का? असे मी त्यांना गंमतीने विचारल्याचे अजित पवार यांनी सांगताच चांगलीच खसखस पिकली; मात्र बारामती नव्हे, तर इतर ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, असे ते म्हणाल्याचा खुलासाही अजित पवारांनी यावेळी केला.