पुणे – मुंबईहून पुण्यासाठी शनिवारी सायंकाळी निघालेल्या सिंहगड आणि डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना मध्यरात्री साडेतीन वाजता खोपोली येथे सिंहगडमध्ये बसविण्यात आले. तर, ही गाडी कसारा घाटमार्गे पुण्यात येणार होती. पण, रेल्वे प्रशासनाने ती रविवारी कसारा घाटातच थांबवली. परिणामी, हे प्रवासी तब्बल 24 तासांनी पुण्यात पोहोचले. या प्रवासात कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. तर, पाऊस आणि दरडींमुळे रेल्वे मार्ग ब्लॉक झाला होता, त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली, असा दावा प्रशासनाने केला आहे.
नेमके काय घडले?
सिंहगड एक्स्प्रेस शनिवारी मुंबई स्थानकातून 8 वाजता सुटली खरी, परंतु ती रविवारी दुपारी तीन वाजता कसारा येथे रेल्वे प्रशासनाने थांबविली. यात डेक्कन क्वीनचेदेखील प्रवासी होते. त्यांना मुंबई ते कसारा घाट प्रवासासाठी 15 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. तर डेक्कन क्वीन रात्री 9.30 वाजता सुटली. डेक्कन क्वीन पहाटे 3 वाजता कल्याण येथे आली. तर, खोपोली येथे “गाडी रद्द झाली आहे’ असे सांगण्यात आले आणि पहाटे 3.30 वाजता प्रवाशांना सिंहगडमध्ये बसविण्यात आले. हे सर्व प्रवासी असणारी गाडी सुमारे 5 तास रात्रीच्यावेळी कसारा परिसरात थांबविण्यात आली. यादरम्यान प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने कोणतीही मदत केली नाही. रविवारी दुपारी 12च्या सुमारास प्रवाशांनी स्वखर्चाने उंबरमाळी स्थानकावर चहा-पाणी केले. अखेरीस दोन बसेसने प्रवासी पुण्यात पोहोचले. चित्रपटासारखी ही घटना काल शेकडो प्रवाशांनी अनुभवली.
माझे 71 वर्षांचे वडील डेक्कन क्वीनमधून निघाले. पहाटे 3.30 वाजता त्यांना सिंहगड एक्स्प्रेसमध्ये बसविण्यात आले. प्रवाशांना पाणीदेखील विचारण्यात आले नाही. वडिलांना मधुमेह आहे. दोन प्रवाशांनी त्यांना समान घटक असणारी गोळी दिली. रात्री बसलेल्या प्रवाशांनी थेट दुपारी स्वखर्चाने थोड्या स्थानकावर खाद्यपदार्थ घेतले. त्यानंतर प्रशासनाने खाद्यपदार्थ पुरविले. प्रवाशांबाबत रेल्वे प्रशासनाची उदासीनता दिसून आली. पण, प्रवाशांचे नातेवाईक काळजीत आहेत.
– दिनाज प्रसाद, प्रवाशांचे नातेवाईक
…चक्क प्रशासनाला नव्हती माहिती
सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्विनमधील प्रवासी कसारा घाट येथे पहाटे अडकले. याची कल्पना रेल्वे प्रशासनाला नव्हती. एका प्रवाशाने माध्यम प्रतिनिधीला ही माहिती दिल्यावर त्याने रेल्वे प्रशासनाला ते कळविले. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी प्रवाशांना पुण्यात आणण्यासाठी हालचाल करण्यास सुरुवात केली. या घटनेची रविवारीदेखील कोणतीही ठोस माहिती नव्हती. पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट “मुंबई विभागा’ची जबाबदारी असल्याचे सांगितले.