मुंबई- मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण याठिकाणी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या नाराजीनाट्यानंतर त्यांना उमेदवारी तर, दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीत लढत असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र आज या मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीचे गणित बिघडणार का? हे पाहावे लागेल.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमकडून रमजान चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. रमजान चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी म्हटले की, महाविकास आघाडी या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देईल असेल वाटते होते. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीची शेवटपर्यंत वाट बघितली.
पण नसीम खान यांना उमेदवारी न दिल्याने आम्ही एमआयएमकडून मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. याठिकाणी कुठल्याही प्रकारे वोट शेअर होणार नाहीत, कारण एमआयएमचा मतदार येथे आहे. आमच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सगळे नेते प्रचारासाठी मुंबईत येतील, असेही वारिस पठाण यांनी स्पष्ट केले.