मुंबई – गेल्या 10 वर्षापासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. पण आजपर्यंत मराठा आरक्षणाचा (Maratha Arakshan) निर्णय का घेतला आला नाही?, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. मराठा आरक्षणावरून सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही आणि ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे, असा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून कोणी रोखले नाही. केंद्रात 10 वर्षापासून भाजपचे सरकार आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही आणि कोणता निर्णय देखील घेतला नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारने मागच्या महिन्यात ससंदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते. यात केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा 50 टक्के काढण्याचा निर्णय घेतला असता, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता.
एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणे चुकीचे आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. अजित पवारांची ही भूमिका योग्य असल्याचे नाना पटोलेंनी म्हटले. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री एक बोलत आहेत तर उपमुख्यमंत्री दुसरेच बोलतात. यामुळे राज्य सरकारमध्ये नेमके काय सुरू आहे हे कळण्यास मार्ग नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. तेव्हाच मराठा आरक्षण मार्गी लागेल, असे नाना पटोलेंनी म्हटले.