पिंपरी – पोशाख, प्रवचन, कीर्तन केले म्हणून कोणी संत होत नाही. ‘तुका म्हणे तोची जगाचे आघात झेली तोची खरा संत ‘ संतांनी साहित्य नाही तर वाङ्मय निर्माण केले. वारकरी व धारकरी शिवाय धर्माचा उद्धार होणार नाही, असे मत गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
निगडी येथे संत साहित्य संमेलनात ते बोलत होते. गुरुदेव शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते अग्निहोत्र प्रज्वलित करण्यात आले. शंखनाद, मंगलमय चौघडा वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष आमदार महेश लांडगे, उद्घाटक अमित गावडे या वेळी उपस्थित होते.अमित गावडे म्हणाले की, संस्कारक्षम पिढीसाठी संत साहित्य संमेलनाची गरज अहे.
शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते हभप किसन महाराज चौधरी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, या वेळी माई गटणे, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, डॉ.सुनिता जोशी, विजय गाडगीळ, सीमा इनामदार, सुहास कुलकर्णी, दिनकर कुलकर्णी या स्थानिक संत साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ निरूपणकार समीर लिमये, हभप शिरीष महाराज मोरे, रविंद्र पाठक, स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या पालखीचे भोई म्हणून डॉ. सचिन बोधनी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक मुख्य संयोजिका शर्मिला महाजन यांनी केले. श्रीकांत चौगुले, डॉ. माधवी महाजन यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाची सांगता सुचेता आडकर यांच्या पसायदानावरील नृत्याने झाली.
अनुष्का स्त्री मंच, ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ व्यासपीठ, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, रसिक साहित्य मंडळ, गौड ब्राह्मण समाज, स्वामिनी महिला मंडळ, शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडी, ब्राह्मण जागृती सेवा संघ यांनी सहकार्य केले.