पवन मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात खरीप हंगाम हा महत्वाचा असतो. भात मुख्य पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या पिकासाठी खरीप हंगामात खूप कष्ट घ्यावे लागते, उत्त्पन्न चांगले तर भातशेतीचे आर्थिक गणित शेतकऱ्यांच्या फायद्याचे असते.
गेल्या हंगामात काही शेतकऱ्यांना बियाणांच्या बाबतीत खूप त्रास सहन करावा लागला होता. काही मानांकित बियाणे कंपन्यांची बियाणे निव्वळ बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या हंगामात बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे.
बियाणे खरेदी करताना अशी काळजी घ्या
– चांगल्या उत्पादनासाठी तितक्याच दर्जेदार बियाण्याची गरज असते, त्यामुळे प्रामुख्याने बीज प्रामाणिकरण यंत्रणेने प्रामाणित केलेले बियाणे खरेदी करावे.
– टॅगवर पिकाचे व जातीचे नाव, बियाण्याचा प्रकार, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, बीज परीक्षणाची तारीख, उगवणशक्ती टक्के, शुद्धतेचे प्रमाण, पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन, विक्रीची किंमत, विक्रेत्याची सही ह्या गोष्टी तपासून पाहावे.
– घेतलेल्या पक्क्या बिलावर बियाणेचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी. मुदत बाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करु नये. भविष्यात जर बियाणांमध्ये दोष आढळला, तर तक्रार करताना या सर्वं गोष्टी उपयोगी पडतात, त्याशिवाय तक्रार ग्राह्य धरली जात नाही.
– बियाणे वापरण्यापूर्वी खालच्या बाजूने पिशवी कापून किंवा छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅग वरील टॅग न काढता रिकामी पिशवी व त्यामध्ये थोडे बियाणे नमुन्यासाठी शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. पेरणी करताना दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरणी करु नये.
– जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी. पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
– बियाणांची उगवण क्षमता पिशवी वरील दिलेल्या टक्केवारी पेक्षा कमी झाल्यास अथवा फार मोठया प्रमाणात भेसळ असल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी.
– उगवण क्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता आणि उत्पादक कंपनी यांच्यावर बियाणे १९६६ मधील कलम १० नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते.
– बियाणांविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी.
– कमी दर्जाचे अथवा बोगस बियाणांमुळे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भात बियाणे पेरणी करण्यापूर्वी पिशवीवरील टॅग, बियाणे पिशवी त्यामध्ये थोडे बियाणे ठेवावे. पक्के खरेदी बिल जपून ठेवावे. बियाणे पेरणी करण्यापूर्वी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. रोपवाटिका गादीवाफ्यावर टाकव्यात, रोपे २१ ते २५ दिवसांची झाल्यावर चारसूत्री पद्धतीने लागवड करावी व युरिया ब्रिकेट खत द्यावे. – विकास गोसावी, कृषिसहाय्यक, शिळीम्ब