नवी दिल्ली (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात राजकीय आणीबाणीसारखी कोणतीही परिस्थिती नाही. विरोधी पक्षाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून करोना संकटाचा सामना एकजुटीने करायला पाहिजे, असा सल्लावजा उपरोधिक टोमणा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लावला.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले मंगळवारपासून दिल्लीत आहेत. आज त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिडला यांची भेट घेतली. करोना संकटाच्या काळात विधानसभेचे अधिवेशन कसे घ्यायचे? याबाबतीत त्यांनी चर्चा केली. झुम ऍप किंवा ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अधिवेशन बोलाविता येईल काय? की लोकसभेचे अधिवेशन आणखी दुसरा पर्याय उपलब्ध आहे, अशा विविध मुद्द्यावर उभय नेत्यांनी चर्चा केली.
महाराष्ट्रात प्रसारमाध्यमांमध्ये राज्यातली परिस्थिती सरकारच्या विरोधात जाईल. सरकार अस्थिर होईल अशा प्रकाराच्या काही बातम्या आल्या होत्या. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पूर्णतः स्थिर आहे. महाराष्ट्रात आम्ही सध्या करोना नावाच्या संकटाशी लढतो आहोत. आज मी दिल्लीत आलो आहे. कारण केंद्र सरकारकडून करोनावर उपाय योजण्यासंबंधीचे निर्देश घ्यायचे आहेत, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती डळमळीत झाल्याच्या काही बातम्या चालल्या. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती महाराष्ट्रात नाही, असे नाना पटोले यांनी ठामपणे सांगितले.