‘Impact Player’ Rule In IPL 2025 : प्रभावशाली खेळाडूंच्या ( Impact Player ) नियमामुळे, यावेळी आयपीएलमध्ये आठ वेळा 250 पेक्षा जास्त धावसंख्येची नोंद झालेली आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि तज्ञांनी असेही म्हटले आहे की, “या नियमाचा गोलंदाजांवर विपरीत परिणाम होत आहे कारण यामुळे संघांना अतिरिक्त फलंदाज मिळत आहेत.” या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी मिळत नसल्याचेही भारतीय कर्णधार रोहित शर्माने देखील म्हटले होते.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतीत विधान केले आहे की, “आयपीएलमधील प्रभावशाली खेळाडू (Impact Player) नियम एक प्रयोग म्हणून लागू करण्यात आला होता आणि सर्व फ्रँचायझींना हवे असल्यास त्यावर पुनर्विचार केला जाऊ शकतो.”
शहा पुढे म्हणाले की, “एक प्रयोग म्हणून इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करण्यात आला. मात्र, यामुळे दोन भारतीय खेळाडूंना खेळण्याची अतिरिक्त संधी मिळत आहे. ते महत्वाचे नाही का? तसेच यामुळे खेळही अधिक स्पर्धात्मक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शाह म्हणाले की, “टी-20 विश्वचषकानंतर सर्व संघ एकत्र येऊन यावर चर्चा करतील. ते म्हणाले, जर खेळाडू आणि फ्रँचायझींना वाटत असेल की हे योग्य नाही तर आम्ही याबद्दल बोलू आणि निर्णय घेऊ. पण, अद्याप कोणीही याबाबत मत मांडलेले नाही. आयपीएल आणि टी-20 विश्वचषकानंतर बैठकीत निर्णय घेतला जाईल. हा कायमचा नियम नाही आणि आम्ही तो रद्द करू असेही मी म्हणत नाही, असं देखील त्यांनी सांगितले.
टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना विश्रांतीची गरज नाही कारण सामना सराव ही सर्वोत्तम तयारी आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले. विश्रांतीची काय गरज आहे? हे अगदी सराव सत्रासारखे आहे. यापेक्षा चांगली तयारी काय असू शकते? तुमच्यासमोर एक उत्तम संघ आहे ज्यात एक गोलंदाज न्यूझीलंडचा आहे, एक ऑस्ट्रेलियाचा आहे आणि एक श्रीलंकेचा आहे. जर आम्ही गोलंदाजाला विश्रांती दिली तर त्याला ट्रॅव्हिस हेडला गोलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही. जसप्रीत बुमराह त्याच्याविरूध्द गोलंदाजी करेल तेव्हाच त्याला हेडसमोर गोलंदाजी कशी करावी हे समजेल.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन…
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सामन्यांची संख्या वाढवण्यावरही बोर्डाचा भर असल्याचे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, पुरुष क्रिकेटप्रमाणेच महिला क्रिकेटचीही काळजी घेतली जात आहे. विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार आहे आणि नुकतीच महिला संघाने बांगलादेशातील टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी केली आहे. महिलांनी 5 सामन्याच्या मालिकेत 5-0 ने निर्भेळ यश मिळवले आहे.