शिरूर शहर व तालुक्यात अल्पवयीन तरुणामध्ये भाईगिरीची हवा गेली असून, यामुळे हे अल्पवयीन मुले गुंडगिरी व व्यसनांच्या आहारी जाऊ लागले आहेत. अशा मुलांकडे पालकांनी वेळेतच लक्ष देणे गरजेचे आहे.
शिरूर तालुका हा रांजणगाव औद्योगिक वसाहत, यामुळे सुरु असलेली ठेकेदारी पद्धत यामधून जवळच्या लोकांकडे मुबलक पैसा आला आहे. या पैशांतून आलीशान गाड्या, गळ्यात वजनदार सोन्याच्या चैनी, उंची राहणीमान, सोबत अंगरक्षक, त्याची गॅग, त्यांचा ग्रुप, त्यांची दादागिरी वाढली आहे. भाई म्हणून दिलेली हाक या सर्वांमुळे लहान वयातील मुलांमध्ये याचे आकर्षण वाढू लागले आहे.
रात्री यांच्या रंगलेल्या पार्ट्या, गप्पा, मद्य प्राशन कल्यानंतर विविध प्रकारचे हत्यारे चाकू, सुऱ्यांपासून अत्याधुनिक बंदुकापर्यंत यांची क्रेझ या तरुणधांमध्ये वाढली आहे. हे सगळेच या कोवळ्या मुलांच्या मनाला छेद देऊन जात आहे. हा नवीन पिढीला बसणारा सर्वांत मोठा धोका असून, याकडे पालकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आपला मुलगा कुठे जातो काय करतो, रात्री घरी कधी येतो, कोणाबरोबर राहतो, याबाबत कधी विचारणा होत नसल्याचे विदारक चित्र आहे.
अधिक पैशांच्या हव्यासाने हेच तरूण वाममार्गालाही लागले आहेत. अनेक अल्पवयीन मुले घरफोडी, मोटरसायकल चोरी, चैन स्नॅचिंग, पेट्रोल चोरी याकडे वळली असल्याचे चित्र आहे. अल्पवयीन मुलांमध्ये व्यसन, भाईगिरीची हवा असून यावर नियंत्रण आणायचे असेल तर पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नाहीतर पश्चाताप करण्यापलीकडे काही करता येणार नाही.