पुसेगाव – लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीमधील जागावाटपामध्ये सातारा, नाशिक, ठाणे व पालघर या जागांसाठी रणकंदन सुरु आहे. त्यामुळे तिसऱया टप्प्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली तरी या मतदारसंघातील चित्र अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.
महाविकास आघाडीचे जागावाटप होताना खूप रस्सीखेच होईल असे वाटत असताना एक दोन जागांचा वाद वगळता महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले. परंतु, महायुतीचे संपूर्ण जागावाटप अजूनही जाहीर झाले नाही. सातारा, नाशिक, ठाणे व पालघर या जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. राज्यात सत्तांतरानंतर भाजप, शिंदे गट, अजित पवार गट असे एकमेकांचे विरोधक एकत्र आले. परंतु, लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या तिन्ही पक्षांतील पारंपरिक विरोधकांचे एकमेकांवर शाब्दिक प्रहार सुरु झाले आहेत. आणि यामुळेच महायुतीत काही जागावर तिढा निर्माण झाला आहे.
ज्या पक्षाचा खासदार त्या पक्षाला तो मतदारसंघ असे जागावाटपाचे सूत्र पहिल्यांदा ठरवल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवले होते. त्याप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळणार अशी खात्री होती. परंतु, विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी उमेदवारीचा आग्रह लावून धरला आहे. पण जागावाटपाच्या तिढ्यात ही जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे.
जागावाटपाच्या सूत्रानुसार नाशिक मतदारसंघ शिंदे गटाला मिळू शकला असता. परंतु, या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्यामुळे भाजप येथे इच्छुक आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथील मेळाव्यात विद्यमान खासदार गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपचे तीन आमदारांनी गोंधळ घातला. परंतु, या गोंधळात सातारा तुम्हाला तर नाशिक आम्हाला असे म्हणत अजित पवार गटाने भर घातली. त्यामुळे साताराही अडकला आणि नाशिकही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा. जिल्ह्यातील मतदारसंघ भाजपला देणे मुख्यमंत्री शिंदे यांना अडचणीचे वाटत आहे. त्यामुळेच नाशिक व सातारा मतदारसंघाबाबत अजूनही निर्णय होऊ शकला नाही.