पुणे – करोना संसर्गामुळे भारतात मृत्यूचे तांडव सुरू आहे. तर, ज्या देशांत 70 ते 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले, ते देश आज करोनामुक्तच तर काही देश लॉकडाऊनमुक्त झाले. आपल्या देशाच्या प्रमुखांनी या कोविडला लक्षात घेऊन त्यापद्धतीचे नियोजन केले असते, तर निरपराध नागरिकांचा जीव वाचला असता, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पुणे विभागीय आयुक्तांमार्फत पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी (दि.24) कॉंग्रेसच्यवतीने निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, आबा बागुल, अभय छाजेड, गोपाळ तिवारी, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, करोनाच्या महाभयंकर संकटात आपली जनता समजून मोफत लस द्यायला पाहिजी होती. सरकारने केवळ दोन कंपन्याना लस निर्मितीची परवानगी देऊन एकाधिकारशाही करायला संधी दिली. करोना प्रतिबंध लसीसाठी केंद्र, राज्य आणि खासगी हॉस्पिटलला वेगवेगळ्या दरांमध्ये लस खरेदी करावी लागणार आहे. याला विरोध आम्ही करत आहोत. पाकिस्तानसारख्या देशाला लस मोफत दिली; मात्र देशातील जनतेला विकत घ्यावी लागते आहे. देशातील अनेक राज्यांत करोनाचा संसर्ग वाढला आहे, तिथे करोनाची आकडेवारी लपवली जात आहे. महाराष्ट्रात करोनाची आकडेवारी लपवली जात नाही, असे स्पष्टीकरणही पटोले यांनी यावेळी दिले.