मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसून येत आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष मुंबईत आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि विशेषत: आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आहे. आशिष शेलार यांनी ट्वीटरवरू एक खुले पत्र शेअर करत ‘सामना’ अग्रलेखावरून शिवसेनेवर टीका केली आहे.
‘सामना’च्या अग्रलेखातून आज शिवसेनेने भाजपाच्या ‘मराठी दांडिया’वर टीकास्र सोडले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या टीकेला आशिष शेलारांनी खुले पत्र लिहून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली..ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे ते पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय. म्हणून ते ‘सामना’तून जळजळ व्यक्त करीत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला ‘मग घ्या ना धौती योग!’ असे म्हणत आशिष शेलारांनी टोला लगावला आहे.
…मग घ्या ना धौती योग!
(आमची सच्चाई रोखठोक!)@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT pic.twitter.com/V8F209jQa1— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 28, 2022
‘करोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे ‘करुन दाखवले’ असे होर्डिंग लावले नाहीत’, असेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, बाळासाहेबांची सेवा करणारे चंपासिंग थापा शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यावरूनही आशिष शेलारांनी टोला लगावला आहे. ‘पण आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता ‘थापा’पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही सण उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली”, असं शेलार या पत्रात म्हणाले आहेत.
‘गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास ‘सामना’कारांना आणि पेग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच”, असेही या पत्रात म्हटले आहे. या पत्रानंतर आता शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.