नवी दिल्ली : दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्राकडून ही बंदी पाच वर्षांसाठी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.
या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत स्वागत केले आहे. पत्रकरांशी बोलतांना ते म्हणाले,’पीएफआय संघटनेवर घातलेली बंदी योग्यच आहे, शिवाय पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकारी नाही. ते पुढे म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील गृहखातं योग्य प्रकारे काम करत आहे. राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात हयगय केली जाणार नाही, असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं. तसेच जे लोक राष्ट्रविरोधी विचार पसरवू पाहत असतील, अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.