नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील क्रीडापटूंच्या सहकार्याने फिट इंडिया मोहिमेचा शुभारंभ केला. त्यात झालेल्या परिसंवादात त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला यो-यो तंदुरुस्ती चाचणी म्हणजे काय असे विचारले.
संघाची निवड करताना खेळाडू पूर्ण तंदुरुस्त आहेत की नाही हे पाहण्यासाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची असल्याचे कोहलीने पंतप्रधान मोदींना सांगितले. एका सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणे मोदी यांनी कोहलीला क्रिकेट तसेच तंदुुरुस्तीबाबत अनेक प्रश्न विचारले व त्याच्या फिटनेसचे कौतुकही केले. देशाची युवा पिढी तुझा आदर्श ठेवते त्यामुळे तुझ्याकडून प्रेरणा घेत अनेक युवक फिटनेसबाबत जागरूक बनतील, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गुरुवारी मोदी यांनी कोहलीसह देशातील अनेक नामवंत प्रशिक्षक, खेळाडू तसेच विविध क्षेत्रात अत्यंत व्यस्तपणे कार्यरत असलेल्या काही निवडक व्यक्तक्तींशी आरोग्य व फिटनेसबाबत फेसबुक लाइव्हद्वारे चर्चा केली. त्यात पंतप्रधान मोदींनी यो-यो टेस्ट म्हणजे काय असे विचारल्यावर कोहलीलाही हसू आले. मात्र, त्याने मोदी यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. मोदी यांनीदेखील अत्यंत गांभीर्याने ही माहिती ऐकली व कोहलीचे कौतुकही केले.
ही टेस्ट होते तेव्हा कर्णधाराला सूट मिळते का, या प्रश्नावर कोहलीला हसू आले. जर या टेस्टमध्ये अपयशी ठरलो तर मलाही संघनिवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही, असे स्पष्टीकरण कोहलीने दिल्यानंतर मोदी यांनीही त्याला दाद दिली.
यो-यो टेस्ट संघासाठी अत्यंत महत्त्वाची असते. यामुळे संपूर्ण संघाची क्षमता वाढते. कसोटीमध्ये पहिल्या काही दिवसांचा खेळ झाल्यानंतर खेळाडू थकतात, त्यातही वेगवान गोलंदाजांना जास्त घाम गाळावा लागतो. त्यामुळे त्यांची संघात निवड करण्यापूर्वी ही टेस्ट करणे खूप महत्त्वाचे असते, असेही कोहलीने सांगितले.