दहा वर्षांनंतर झाले घोषित : “19 मराठा रेजिमेंट इंफट्री’ पथकाचे करताहेत नेतृत्व
राजगुरूनगर (पुणे)-सियाचीन बॉर्डरवर केलेल्या पराक्रमांची दखल घेत सैन्य दलाकडून कमांडर आनंद बाळासाहेब खंडागळे (रा. गाडकवाडी, ता. खेड) या भारतीय वीराला सैन्यदलातील मानाचे “सियाचीन मेडेल’ येत्या 26 जानेवारीला दिल्ली येथे सैन्यदल प्रमुख मनोज मुकुंद ननवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांत हे पदक सैन्यदलात कोणालाही देण्यात आलेला नाही. कमांडर आनंद खंडागळे यांच्यासह राहुल गाजरे (लातूर) यांनाही सियाचीन मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय सैन्यदलाच्या “19 मराठा रेजिमेंट इंफट्री’ पथकाचे नेतृत्व करणाऱ्या व सियाचीन भागात सेवा केल्यानंतर काही दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या कमांडर आनंद खंडागळे यांच्याशी आमचे प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारत-चीन सीमेवरील अनुभव सांगितला. आनंद खंडागळे म्हणाले, गेली काही महिने युद्धजन्य स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सियाचीन भागात 78 किलोमीटर बर्फाच्छादित डोंगर व पर्वत रांगांत भारत, पाकिस्तान आणि चीनचे सैनिक आपापल्या देशाच्या सीमा रक्षणाचे काम अहोरात्र करतात.
एका वेळी भारताचे 1 हजार 500 सैनिक येथे बर्फाच्या कृत्रिम गुहारुपी घरात तैनात असतात. दोन देशांच्या चिघळलेल्या स्थितीत चीनी सैन्याबरोबर सौहार्दतेने आणि तेवढ्याच तडफेने सामना करण्यासाठी देशाचे संरक्षण खाते नेहमी मराठा सैनिकांना प्राधान्य देते. संघर्षात्मक स्थितीत शत्रूला नामोहरम करण्याचे धैर्य आणि तसा कावा आखणाऱ्या पथकांच्या नेतृत्वांमध्ये खेड तालुक्यातील आनंद खंडागळे यांची निवड करण्यात आली होती. जाहीर वाच्यता न करता येणाऱ्या अनेक युद्धजन्य घटना त्यांनी घडवून आणल्या.
मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात खंडागळे यांना पाकिस्तान सीमेवर पाठवण्यात आले होते. तेथूनच सियाचीनच्या सीमेवरील स्थिती हाताळण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. नुकतेच म्हणजे 18 सप्टेंबरला ते गावी आले आहेत. सियाचीनच्या अनुभवाचे पुस्तक लिखाण करणार आहे. शिवाय सीमेवरील देशसेवा झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेत उतरून पोलीस अधिकारी बनून खात्याच्या माध्यमातून जनसेवा करणार असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.
समुद्रसपाटी पासून 21 हजार फूट उंचीवर, उणे 55 ते 60 अंश सेल्सियस तापमानात 40 फूट बर्फात खड्डा करून स्वत:ला गाडून घ्यायचे, ऑक्सिजन कमी असल्याने हालचाल गरजे इतकीच करायची, एकमेकांशी बोलायचे ते सुद्धा मर्यादित, जेवण मिळो ना मिळो अंगावर 35 किलोचा सुरक्षा पोशाख घालून अवजारे सांभाळत 24 तास जवळ असलेला दारू गोळा शत्रूच्या नजरेतून राखायचा. प्रसंगी त्याचाच वापर करून प्रतिहल्ला करायचा. हो आणि हे काम हाती घेतले तर किमान सहा महिने मागे फिरता येत नाही. मातीशी असलेली नाळ व नात्यातील बंधने झुगारून देऊन देशाच्या संरक्षणासाठी स्वत:ला मरणाच्या सीमेवर झोकून देणे म्हणजे भारत भूमीचा सुपुत्र असल्याचे सिद्ध करण्याचा महायज्ञ पार पाडल्या सारखे आहे. असे त्यांनी सांगितले.