पुणे – इंडिया आघाडीमध्ये असलेले पक्ष हे घराणेशाहीचे पक्ष आहेत. त्यामुळे परिवार बचाव हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. देशातील जनतेचे हित प्रथम मानणाऱ्या मोदींच्या नेतृत्वालाच जनता पसंती देईल हे स्पष्ट आहे, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जावडेकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास त्यांनी दहा वर्षांत करून दाखवलेले काम, जगामध्ये भारताची वाढलेली प्रतिष्ठा, देशाची झालेली आर्थिक प्रगती, देशात गरीब कल्याण योजना लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आहे. २०१४ मध्ये भारताची ख्याती एक जर्जर अर्थव्यवस्था अशी होती.
आता ती पहिल्या ५ मजबूत अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाते. याबरोबर रस्ते, रेल्वे, बंदर, जलमार्ग, विमान वाहतूक अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये फार मोठे बदल लोकांना अनुभवायला मिळाले. गरिबांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी ज्या पद्धतीने असंख्य समाजकल्याण योजना मोदी सरकारने यशस्वी व प्रभावीपणे पार पाडल्या, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या.
या सर्वांचा जनतेच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील जनता देशहित प्रथम मानणाऱ्या मोदींच्या नेतृत्वालाच पसंती देईल, हे स्पष्ट असल्याचा दावा जावडेकर यांनी केला आहे.