मुंबई – राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून म्हणजे 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. डिसेंबरच्या 30 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला.
या अधिवेशनात अंदाजे 21 विधेयकं सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसंच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं विशेष कार्यक्रम राबवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, तसंच आपली उपेक्षा होत असल्याची विदर्भ वासियांची भावना दूर करण्यासाठी हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं घ्यावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बैठकीत केली.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष नागपूरला अधिवेशन झालं नव्हतं त्यामुळे सरकारनं जास्त कालावधीचं आधिवेशन घेतलं पाहिजे असं, ते म्हणाले. याबाबत अधिवेशन काळात नागपूरमधे 28 डिसेबरला होणाऱ्या पुढच्या बैठकीत निर्णय घ्यायचं मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मान्य केलं.