पुणेः जेजुरी गडावरील अहिल्याबाईंच्या पुतळ्यांचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे,मात्र यामुळे नवा वाद पेटणार असल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन उद्या होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण गोपीचंद पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्यानं त्याचं उद्घाटन रखडले होते. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचे अनावरण होऊ नये, अहिल्यादेवींचे काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होते. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, म्हणून आम्ही गनिमी काव्याने पुतळ्याचे अनावरण केले, असे पाडळकरांनी म्हटले.
शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो, असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
दरम्यान, औंढा नागनाथ येथील अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचे अनावरण खरं तर गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीलाच होणार होते. मात्र वर्ष उलटूनही या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रात पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. तसेच पत्राच्या सरतेशेवटी जर अनावरण कार्यक्रम झाला नाही तर समस्त समाज बांधवांच्या हस्ते होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकरांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.