पुणे -टाळ-मृदंगांचा ठेका आणि “विठुनामाच्या गजरात पुणे ते दिवे घाट प्रवास कधी पूर्ण होतो कळतही नाही. त्यामुळे दरवर्षी “याची देही, याची डोळा’ पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी, सोहळ्याची शिस्त, एकजुटीचे प्रतीक अनुभवण्यासाठी आणि मानसिक समाधान मिळण्यासाठी पुण्यासह राज्य आणि परदेशातून भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. हा सर्व प्रवास दिशा आणि उर्जा देणारा असतो.
येत्या दि. 10 जूनला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू येथून, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 11 जून रोजी आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. दोन दिवसांच्या (दि.12 व 13 जून) मुक्कामानंतर दि. 14 जून रोजी पुणेकर उठायच्या आधीच दोन्ही पालख्या पुण्यनगरीचा निरोप घेत पहाटे सहा वाजता मार्गस्थ होतील. सोहळ्यातील सर्वांत मोठा टप्पा हा पुणे-सासवड असून, त्यामध्ये दिवे घाटासारखा अवघड प्रवासही आहे. वारकऱ्यांचे उपवास असले, तरी टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर अभंग, भजन म्हणत पाय आपोआप चालतात.
हाच अनुभव घेण्यासाठी दरवर्षी पुण्यासह देश-परदेशांतील व्यक्ती त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व “हौशी वारकरी’ पुणे ते दिवे घाट या अंतरामध्ये पालखी सोहळ्यात चालतात. प्रत्येक वर्षी या हौशी वारकऱ्यांची संख्या वाढताना दिसते. बहुतांश भाविक आळंदी तर काही पुण्यातून पालखीबरोबरच जातात. त्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळेएकदा तरी वारी केलीच पाहिजे, असे वाडवडील सांगतात.
माऊली…माऊली म्हणत घाट पार होतो…
रथातील माऊलींच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. दुपारी एक ते दीडच्या सुमारास दिवे घाटाच्या पायथ्याला पालखी सोहळा विसावतो. बांधून आणलेला किंवा विसाव्याजवळ तयार केलेल्या फराळ करून दिवे घाट अवघड चढण सुरू होते. मात्र, अवघड वाटणारा घाट “माउली…माउली’ जा जयघोष करत पावलांना गती मिळते आणि काही मिनिटांतच घाट पार होतो.