सोनई – कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज लाखो टन कापूस शेतकऱ्यांच्या घरात भावाच्या प्रतिक्षेत पडून आहे. ऐन कांदा काढणीच्या वेळेस पाऊस सुरू झाल्यामुळे हजारो हेक्टर कांदा बांधावर सडत पडलेला आहे. जो कांदा हाती लागलेला आहे तो वाहतूक खर्चालाही महाग पडत आहे. ‘कापूस पडला घरी, कांदा सडला बांधावरील आणि तरीही हे सरकार म्हणतंय शासन आपल्या दारी’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या संकटातून कसाबसा सावरून शेतकरी परिस्थितीशी झगडत उभा राहिला. त्यानंतर निसर्गाची साथ न भेटल्यामुळे तो पूर्णतः कोसळण्याच्या स्थितीत आहे. ज्या सरकारकडे मायबाप या अपेक्षेने पाहत होता त्या सरकारने सुद्धा घात केला. नको त्या प्रश्नांना हवा देत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण अशा बळीराजाच्या पिळवणुकीच्या प्रश्नांकडे मात्र कुठल्याही नेत्याचे अथवा मीडियाचे लक्ष जाताना दिसून येत नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे.
सरकार तुटपुंजी मदत देऊन बळीराजाला लाचार करून टाकण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्याच्या पिकाला जर उत्पन्न आणि खर्च या तोडीत योग्य हमीभाव दिला तर तुमच्या मदतीची गरज काय? शेतकरी संघटना सुद्धा जाणीवपूर्वक या गोष्टीकडे पाठ फिरवतानाचचे चित्र दिसून येत आहे. कपाशीच्या विशिष्ट वाणांची सध्या जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई करण्यात आलेली आहे.
संकटांना तोंड देता शेतकरी मेटाकुटीस
शेतीमालाच्या भावाची लावलेली वाट आणि शिंदे सरकारचा थाट ही गोष्ट महाराष्ट्रात टोकाला गेलेली आहे. 2023 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात दुःखदायी ठरले आहे. अवकाळी संकटाला तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीस आला असून, सरकारने मात्र शेतकऱ्याची चांगलीच जिरवण्याचे काम चालू केली असल्याचा आरोप होत आहे.