जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या रविवारी बंड झाले अन् अजित पवार यांनी आपल्यासह आणखी दिग्गजांनाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर शरद पवार यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सोमवारपासूनच पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह इतर आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नवनिर्वाचित मंत्री आपल्या गावी आले. मग त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. परंतु जळगाव जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी मंत्र्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले.
अमळनेरचे आमदार अनिल पाटील कॅबिनेट मंत्री यानंतर ते पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले. यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दुतर्फा उभे करण्यात आले. सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील एस एस पाटील आश्रमशाळेचे विद्यार्थी दोन तास रस्त्यावर उभे होते. मंत्र्यांची वाट पाहत विद्यार्थी रस्त्यावर उन्हात उभे होते. जास्त वेळ उभे राहून थकल्यामुळे विद्यार्थी शेवटी जमिनीवर बसून गेले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सुद्धा यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की,’स्वागत करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर ताटकळत ठेवणं, हे कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारं आहे… राष्ट्रवादी काँग्रेसची तर ही विचारधारा असूच शकत नाही.. आणि संगतीचा परिणाम अवघ्या चार दिवसातच होत असेल तर हे जरा आश्चर्यकारकच आहे..’ असेही त्यांनी लिहिले आहे.