शिलाँग: मेघालयमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्याचे काही नाव घेत नाही. त्यातच आता राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सुरक्षा ताफ्यावर शिलाँगमध्ये हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राज्यपालांच्या सुरक्षा ताफ्यावर गुवाहाटी विमानतळावरून परतल्यानंतर ते मावलाई हायवेला जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दरम्यान, त्याच्या सुरक्षा ताफ्यावर दगडफेक झाली, ज्यात अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने, दगडफेकीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
मेघालयमध्ये प्रतिबंधित हिनट्रॅप नॅशनल लिबरेशन कौन्सिल (एचएनएलसी) चा माजी नेता चेस्टरफील्ड थांगखू याच्या मृत्यूनंतर मेघालयात हिंसाचार उसळला आहे. थांगखूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळाली होती, पण त्यानंतर त्याचा चकमकीत मृत्यू झाला. थांगखूच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर परिसरात तणाव पसरला आहे.
मेघालयातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, 15 ऑगस्ट रोजी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. त्यानंतर राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली होती.