कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेली माहिती अशी की, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होती. स्थानिक ग्रामपंचायतीची या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी असतानाही तो कर्नाटक सरकारनं हटवला आहे. सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
शिवसेना आक्रमक ; कोल्हापुरात कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा रातोरात हटवल्यानंतर आता या घटनेचे पडसाद कोल्हापूरात उमटू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणार या कर्नाटक प्रशासनाच्या विरोधात कोल्हापूरात शिवसेना आक्रमक झालीय. शिवसेनेचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन केल आहे.शिवाय कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आदेश येताच कर्नाटकात घुसू असा सज्जड दम देखील कन्नडीगाना दिला आहे.
कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसंच कर्नाटक सरकारला इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात त्यांना महाराष्ट्रातून पळून लावू असा इशारा देखील शिवसेने दिला आहे.