कोलकाता: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात असतो अगदी तसाच तणाव गुलाबी चेंडूने खेळल्या जाणार असलेल्या कसोटी सामन्याबाबत जाणवत असल्याच्या भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केल्या आहेत.
गुलाबी चेंडूने खेळवल्या जाणाऱ्या देशातील पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याची तुलना करताना कोहली म्हणाला, गुलाबी चेंडूने खेळणे आव्हानात्मक असेल. विश्वकरंडकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासारखेच हे थरारक वाटत आहे, असेही कोहलीने म्हटले आहे.
कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची तिकिटे संपली आहेत. या कसोटीला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याचा विश्वासही कोहलीने व्यक्त केला. गुलाबी चेंडूविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे.
सर्वसामान्य लोकांमध्येच नाही तर व्हीआयपींमध्ये देखील याच सामन्याची चर्चा आहे. त्यामुळे अन्य सामन्यापेक्षा एकदम वेगळेच वातावरण तयार झाले आहे, एक खेळाडू म्हणून मीच नव्हे तर संपूर्ण संघ देखील एक निराळाच क्षण अनुभवत आहोत, असेही कोहलीने सांगितले.