हिमांशू
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असे कितीही वेळा सांगितले आणि ऐकले गेले, तरी दिल्ली आणि मुंबईत अजून किती अंतर आहे, हे आपण यथेच्छ अनुभवले. सत्तावाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले कागदावर लिहून त्यांची व्यक्तिशः देवाणघेवाण केली गेली. नेतेमंडळी श्रेष्ठींना भेटण्यासाठी, परस्परांमध्ये विचारविनिमय करण्यासाठी मुंबई ते दिल्ली, मुंबई ते जयपूर अशा वाऱ्या करत राहिले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आलंच पाहिजे, असे आपल्याला कानीकपाळी ओरडून सांगणाऱ्या या नेत्यांनी स्वतः मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवण्याऐवजी व्यक्तिगत संपर्कावरच अधिक भर दिला. अर्थात, एकमेकांना जे सांगायचं त्यात कोणताही संभ्रम असता कामा नये, हे कारण त्यामागे आहेच.
सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी बोलताना “टोन’ कळत नसल्यामुळे गैरसमज आणि तेढ निर्माण होते, हे आता बरेचजण मान्य करू लागलेत. तात्पर्य, तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही. जी कामं दोन माणसं एकमेकांना भेटल्यावरच योग्य प्रकारे पूर्ण होऊ शकतात, त्यासाठी तंत्रज्ञान हा पर्याय असू शकत नाही, किंबहुना तसा प्रयत्न केल्यास भलतंच काहीतरी घडू शकते, हे समजण्याइतका सुज्ञपणा आपल्या नेत्यांकडे निश्चित आहे. तंत्रज्ञान ज्यांनी घडवायचं, त्या शास्त्रज्ञांना मात्र तंत्रज्ञानावर इतका भरवसा, की ऑनलाइन फसवणूक झालेल्या तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या यादीत दोन शास्त्रज्ञांचीही नावं यावीत, हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.
हेच पाहा ना, व्यवसाय करायचा म्हटल्यावर ज्याच्याशी व्यवहार करायचा, तो समोर असला पाहिजे, हा नियम ऑनलाइन व्यापारामुळे मोडीत निघाला. परिणामी, एकीकडे मोठी सुविधा निर्माण झाली, तर दुसरीकडे फसवणुकीची शक्यताही वाढली. मुंबईच्या एका निवृत्त शास्त्रज्ञाला परदेशातल्या एका “फेसबुक मैत्रिणी’ने व्यवसायाची ऑफर दिली. आपण औषध कंपनीत काम करतो आणि विशिष्ट प्रकारच्या औषधी तेलाला ऑस्ट्रेलियात मोठी मागणी आहे, असे तिने शास्त्रज्ञाला सांगितले. या तेलाची विक्री करणाऱ्या दिल्लीतील एका व्यक्तीकडून तुम्ही हे तेल विकत घ्या आणि दुप्पट दरात विका, असा सल्लाही या मैत्रिणीने शास्त्रज्ञाला दिला. नफ्यातला सत्तर टक्के वाटा तुमचा, असे आमिष दाखवले. परिणामी, साडेतीन लाखांचा ऍडव्हान्स दिल्लीला पाठवून शास्त्रज्ञ महोदय वाट पाहात बसले. अर्थातच “तेलही गेले आणि पैसेही गेले,’ अशी त्यांची परिस्थिती झाली.
त्यांची ती फेसबुक मैत्रीण फोन घेईनाशी झाली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे शास्त्रज्ञ महाशयांच्या लक्षात आले. तसे पाहायला गेले तर फसवणुकीचा हा अगदी सामान्य प्रकार. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून टोपी घालण्याच्या असंख्य प्रकरणांमधले हे एक प्रकरण. परंतु फसवणूक झालेला स्वतः शास्त्रज्ञ असल्यामुळे या घटनेला अचानक वेगळे परिमाण प्राप्त झाले.
मुंबईच्याच आणखी एका शास्त्रज्ञाला घर बदलायचे होते. जुन्या घरातले सामान नव्या घरात नेण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर “मूव्हर्स अँड पॅकर्स’ सर्च मारला. सापडलेल्या नंबरवर फोन केला. साहित्याच्या वाहतुकीचे 79 हजार रुपये ठरले. घरात ज्येष्ठ नागरिक असल्यास मिळणारी सवलत जमेस धरून 59 हजारांवर सौदा निश्चित झाला. शास्त्रज्ञाने पैसे भरले आणि “शिफ्टिंग’च्या दिवशी कुणीच आले नाही. तात्पर्य, आपल्याला “ऑनलाइन’ विश्वात गुंतवून स्वतः तंत्रज्ञानाचा वापर टाळणारे नेतेच हुशार!