आळंदी – पंढरीचा पोहा आला अलंकापुरी । पंच कोसावरी साधुजन ॥ पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥
पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥ अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळंकापुरी येते जाले ॥ सोपानानें मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥
ज्ञानोबा… माऊली..चा गजर, टाळ, वीणा, मृदंगाचा निनाद, ब्रम्हवृंदांचा मंत्रघोष अशा भक्तीमय वातावरणात परंपरेनुसार ह.भ.प. बाळासाहेब पवार, हैबतरावबाबा वंशज प्रतिनिधी यांच्यातर्फे श्रीगुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होऊन आज (दि. 5) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी सोहळ्याला सुरुवात झाली. वेद मंत्राच्या जयघोषात दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तर, पुष्पहार, फुले अर्पण करून प्रसाद महानैवेद्य दाखवण्यात आला.
यावेळी विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ, हभप भावार्थ देखणे, अॅड.राजेंद्र उमाप, हभप केशव महाराज नामदास, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त राजेंद्रसिंग गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, डी.डी.भोसले, राहुल चव्हाण, अजित वडगावकर, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर दिघे आदी भाविक उपस्थित होते.
देव, संतांचे पालखी सोहळे आळंदीत दाखल –
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे वर्णन माऊलींचे समकालीन संत नामदेव महाराज यांनी त्यांच्या अभंग गाथेमधील 72 अभंगामध्ये केले आहे. त्यामध्ये पंढरपूरहून श्री पांडुरंग तसेच विविध ठिकाणाहून इतर संत या सोहळ्याला आल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पंढरपूर येथून निघालेली श्री पांडुरंगराय पालखी, संत शिरोमणी नामदेवराय पालखी, पुंडलीकराय दिंडी यांसह इतर फडकरी मंडळींच्या दिंडी आज (दि. 5) कार्तिक वद्य अष्टमीला नेमाप्रमाणे आळंदीत दाखल झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी आता राज्यातील विविध भागातून निघालेल्या दिंडी, पालखी आळंदीत दाखल होत आहेत.
पंचक्रोशीत हरिनाम सप्ताह सुरु
आळंदी पंचक्रोशीत ठिकठिकाणी विविध धर्मशाळा, वारकरी आश्रमामंध्ये अखंड हरिनाम सप्ताहांना सुरुवात झाली आहे. दैनंदिन काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर असे वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम होत असून चोहीकडे हरिनामाचा गजर ऐकायला मिळत आहेत.
राहुट्या, धर्मशाळांमध्ये भाविकांचा मुक्काम
माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी देश-राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक आता आळंदीत दाखल होत आहेत. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात. बहुतांश भाविक हे 5-7 दिवस आळंदीत मुक्कामी असतात. त्या-त्या भागातील भाविकांच्या आळंदीत असलेल्या धर्मशाळा, वारकरी आश्रम तसेच उघड्या जागेवर राहुट्या उभारून भाविक राहत असतात. विविध ठिकाणी वारकर्यांनी राहूट्या उभारलेल्या दिसून आल्या.
आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम
कार्तिक वद्य नवमी, बुधवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 ते 5 पवमान, अभिषेक व दुधारती, पहाटे 5 ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12:30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 वीणा मंडपात ह.भ. प. बाबासाहेब देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री 8:30 ते 9 धुपारती, रात्री 9:30 ते 11 वा. वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा.