पुणे {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रूपाली चाकणकर यांनी मतदानाच्या वेळी ईव्हीएमची केलेली पूजा ही भावनेच्या भरात केलेली चूक आहे. त्यामुळे नियमानुसार कारवाई होईलच, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात आजपर्यंत झालेल्या तीन टप्प्यांतील मतदानात मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेल्या प्रतिसादावरून ते विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख, संजय मयेकर, हेमंत लेले, मिलिंद पवार उपस्थित होते.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केली. त्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पैशांचे वाटप झाले, आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवीगाळ केल्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तटकरे म्हणाले, कधी कधी भावनेच्या भरात चूक होत असते. चाकणकर यांच्या हातून चूक झाली आहे.
नियमानुसार काय ती पुढील कारवाई होईल. पैसे वाटप करण्याचा आरोप, तक्रारी करणे हस्यास्पद असून, त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे, असे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा यापूर्वी तीन वेळा निर्णय झाला होता, याचाही तटकरे यांनी पुनरुच्चार केला.
राहुल गांधी अपरिपक्व नेतृत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले, तर देशाची राज्यघटना बदलली जाईल, असे आरेाप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अपरिपक्व नेतृत्व आहे. ३७० कलम, सीएए कायदा आदींविषयी अल्पसंख्याकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे; पण तो आम्ही दूर करीत आहोत, असेही तटकरे यांनी नमूद केले.