मुंबई, – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर महासंकट निर्माण झाल्यानंतर अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना पुन्हा मोठे महत्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
राज्याने नुकत्याच चुरशीच्या आणि राजकीय प्रतिष्ठेच्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका अनुभवल्या. त्या निवडणुकांत अपक्ष आमदार आणि लहान पक्षांचा राजकीय भाव वधारला. आता शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यानंतर राज्यात राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे 29 अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचे महत्व पुन्हा वाढले आहे. त्या आमदारांपैकी 13 अपक्ष आहेत.
राज्य विधानसभेचे एकूण संख्याबळ 288 आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाल्याने 1 जागा रिक्त आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी बहुमताचा 144 हा आकडा गाठणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारने 30 नोव्हेंबर 2019 या दिवशी विधानसभेत बहुमत सिद्ध केले.
त्यावेळी सरकारच्या पाठिशी 169 आमदार उभे राहिले. त्यामध्ये काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांचाही समावेश होता. मात्र, तेवढे संख्याबळ आता महाविकास आघाडीकडे नसल्याचे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यास अपक्ष आणि लहान पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.