रामपूर – उत्तर प्रदेशच्या आझमगढ आणि रामपूर या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिडणूक होत असून प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे बलशाली नेते आझम खान यांच्यावर जोरदार टीका केली. रस्सी जल गयी लेकीन बल नही गये…अशा शब्दांत त्यांनी आझम खान यांच्यावर निशाणा साधला
रामपूरचा वारसा काही लोकांनी नष्ट करून टाकला असे नमूद करून ते म्हणाले की रामपुरी चाकू जेव्हा डबल इंजिनच्या सरकारच्या हातात असतो तेव्हा तो गरिबांचे रक्षण करतो. गरीब हा गरीबच असतो. त्याची कोणती जात नसते. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने येथील भूमाफियांना धडा शिकवण्याचे काम केले आहे. कायद्याची पायमल्ली कोणाला करू दिली जाणार नाही. काही लोकांनी रामपूरची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दंगेखोरांचा सन्मान केला जायचा. मात्र आता तसे होत नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनीही यावेळी विरोधी पक्षांवर टीका केली. तसेच दोन्ही जागा भाजप पूर्ण शक्तीने लढत असून दोन्ही ठिकाणी आपला विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच टीका करताना विचारांच्या आणि मुद्द्यांच्या आधारे केली जावी अशा शब्दांत त्यांनी आझम खान यांना लक्ष्य केले.