औंरगाबाद – एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचे ताकद संपलेली नसून आम्ही पुन्हा एकदा उभे राहू. तसेच हे बंड जास्त काळ टिकणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. याशिवाय शिवसेनेने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबायला सुरुवात केली असल्याचा इशारा दिला.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेनेची ताकद संपलेली नसून संघटन मजबूत करण्यामध्ये शिवसेना कधीच मागे राहिलेली नाही. काही लोक गेले तर शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही. शिवसेनेचे संघटन हे खूप मोठे असून शिवसैनिक शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. जिल्ह्यातील काही आमदारांनी बंडखोरी केली. मात्र अजूनही त्यांच्याकडे परत येण्याची वेळ आहे. जर ते परत आले नाही तर मतदार त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असे खैरे म्हणाले.
तसेच, शिवसेनेचा आक्रमकपणा गेला असे कोणीही समजू नये. शिवसेना ही आक्रमक असून वेळ आल्यास शिवसैनिक त्यांचा आक्रमकपणाही दाखवतील. शिवसेना ही मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली होती.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला व्यवस्थितपणे उभे केले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी चुकीचे कारण देऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी पुकारली आहे. हे बंड जास्त काळ राहणार नाही. कारण या सर्व बंडखोरांना पुन्हा एकदा मतदारांना तोंड दाखवावे लागणार आहे, असा दावा त्यांनी केला.