चाळीसगाव – जेटसारखी कंपनी बंद पडली तर वीस हजार तरुण बेरोजगार झाले. मागची पाच वर्षे हातात सत्ता यांची आणि हे इथे येऊन आम्हाला बोलतात, तुम्ही काय केले? तुम्ही जबाब द्यायला हवा! आज याचे उत्तर जनता देईल आणि 21 तारखेला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
आघाडीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची चाळीसगावमध्ये सभा झाली. यावेळी पवार म्हणाले, आपल्या भागाचा विकास करणारा एक उत्तम उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. तुमच्या सुख-दुःखात उभं राहणारं व्यक्तिमत्व निवडून येण्याची गरज आहे.
राजीव देशमुख यांचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यात आपण कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजीव देशमुख यांनी आपल्या भागात कारखाने आणले, तरुणाच्या हाताला काम दिलं. पण आजचे राज्यकर्ते कारखानदारी बंद करण्याच्या मागे आहेत. तरुणाच्या हातातील रोजगार काढून घेण्याचे काम यांनी केले, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पैलवान नसल्याच्या दाव्याला उत्तर देताना पवार म्हणाले, मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहित नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.