मुंबई – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा खुलासा केला आहे. २०१४ सालीच्या निवडणुकीनंतरही शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणले कि, शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासाठी २०१९च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरुवातीला नकार दिला होता. परंतु, खूप विचाराअंती सोनिया गांधी सरकारमध्ये सामील होण्यास तयार झाल्या.
ते पुढे म्हणाले, अशीच परिस्थिती पाच वर्षांपूर्वीही तयार झाली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतात सरकार बनवले होते. आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. त्यावेळीही भाजपला थांबवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन पक्षांचे एकत्र सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण विजय आणि पराभव होतच असतो. आमचा पराभव झाला तर आकाश कोसळले नाही. आम्ही याआधीही विरोधी पक्षात बसलो होतो असे म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रस्ताव फेटाळून लावला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही पाच वर्ष फडणवीस सरकार पहिले. यादरम्यान लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदारांना ब्लॅकमेल आणि पदांची लालसा देऊन भाजपप्रवेश करवून घेतला. हे एकप्रकारचे विरोधी पक्षांना संपविण्याचे काम भाजपने केले. फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टचारही मोठ्या प्रमाणात झाला. तसेच शिवसेनेलाही धोका दिला. या सर्व मुद्यांवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी सत्ता स्थापन करण्यावर सहमती झाली, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.