शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन
सणबूर – केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक मते मागायला दारात येणाऱ्या युवा नेत्यांना गत पाच वर्षांत आमच्यासाठी नेमके काय केले म्हणून आम्ही तुम्हाला मते द्यायची असा जाब मतदारांनी विचारावा. आपण निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत लढत आलो आहोत.
आताही विकासकामांच्या मुद्द्यांवरच निवडणूक लढवित आहोत. येणाऱ्या निवडणुकीत विकासकामांच्या माध्यमातून गाव समृध्द करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी मतदार संघातील जनतेने ठाम उभे रहावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.
तारळे विभागातील पाबळवाडी, बांधवाट, दुसाळे, वजरोशी, खडकवाडी, बामणेवाडी, जिमनवाडी, बागलेवाडी, भोकरवाडी, जळव, मरळोशी, ढोरोशी, घोट, जुगाईवाडी, आंबळे, वेखंडवाडी, तारळे या गावामध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, कामे करायला आमदार आणि मते घ्यायला माजी आमदार आणि त्यांचे निष्क्रिय सुपुत्र अशी परिस्थिती होवू नये. माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र केवळ पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत. निवडणूक विधानसभेची आणि माजी आमदार पुत्र प्रचार करतायत कारखान्याचा. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. मतदारसंघातील जनतेने विकासकामांनाच कौल देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
आज या विभागात विरोधकांचा दौरा होता त्या दौऱ्यात त्यांना मतदारांनी किती प्रतिसाद दिला आहे याची आपण माहिती घ्यावी. आज मतदार त्यांच्यापुढे येण्यास तयार नाहीत कारण त्यांनी पाच वर्षात जनतेला काहीही दिलेले नाही. विकासाच्या कामाकरीता यापुढेही भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बबनराव शिंदे, गजानन जाधव, सोमनाथ खामकर, संजय देशमुख, अभिजित पाटील, अशोकराव शिंदे, रणजित शिंदे, नामदेवराव साळुंखे, माणिक पवार, विजय पवार, गजानन पाटील, भाऊसो जाधव, एस. के. वाघडोळे, श्रीकांत सोनावले, रामचंद्र लाहोटी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन जाधव यांनी केले. आभार एस. के.वाघडोळे यांनी मानले.
आमच्याच मंडपात भाषण ठोकून गेले युवा नेते
बामणेवाडी येथे आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार सभेकरिता मंडप उभारला होता. मात्र मी या गावात येण्यापूर्वी युवा नेते गावात आले. सभा कुठे आहे हेही त्यांना ठाऊक नसल्याने त्यांनी आमच्याच मंडपात आमच्याच स्पीकरवर भाषण ठोकले. यावरुन युवा नेते किती कर्तृत्ववान आहेत याचा प्रत्यय येतो, असा टोलाही शंभूराज देसाई यांनी लगावला.